Monday, December 20, 2010

वसंतराव नाईक


तमाम मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र येऊन अभूतपूर्व असा देदीप्यमान लढा देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला या घटनेला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण नुकताच मोठय़ा थाटामाटाने सुवर्ण महोत्सव साजरा केला.
या ५० वर्षांच्या वाटचालीत विधानसभेच्या एकूण अकरा निवडणुका पार पडल्या; परंतु या प्रदीर्घ काळात १५ जण मुख्यमंत्री झाले. त्यात वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार या तिघांनी प्रत्येकी तीनदा तर शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना प्रत्येकी दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविण्याचे भाग्य लाभले.

उरलेल्या सगळ्यांना पहिल्याच वेळी आवरून जावे लागले. अर्थात सगळेच मुख्यमंत्री लोकांना अगदी हवे होते किंवा त्यांची कर्तबगारी ओसंडून वाहत होती म्हणून या पदावर आरूढ झालेले होते, अशातला भाग नाही! त्यामुळे काही कारणाशिवाय आले तसे गेलेही!
या सर्वात खरे भाग्यवान ठरले ते वसंतराव नाईक हेच. त्यांना पहिल्यांदा ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ पर्यंत म्हणजे ३ वर्षे २ महिने २६ दिवस, दुसऱ्यांदा ५ वर्षे १२ दिवस आणि तिसऱ्यांदा २ वर्षे ११ महिने ७ दिवस असे एकूण ११ वर्षे २ महिने १५ दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे भाग्य लागले. इतका प्रदीर्घ काळ त्या आधी तर सोडाच, परंतु त्यानंतर कोणाही मुख्यमंत्र्याला लाभला नाही. या अर्थाने वसंतराव नाईक हे खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत. संपूर्ण देशातील निरनिराळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर त्यांच्या समकालीन मुख्यमंत्र्यांपेक्षा वसंतरावांची कारकीर्द अधिक आखीव-रेखीव आणि तळपतीसुद्धा दिसली. त्या काळात त्यांनी राज्यात आखलेली धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी यातही उजवे होते. यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या भक्कम पायावर नाईक यांनी महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची इमारत अधिक भक्कमपणे उभारली. आपल्या कृतिशील, प्रेमपूर्वक वागणुकीने साऱ्या जनतेला व त्यातही तळागाळातल्या गोरगरीबांना त्यांनी आपलेसे केले. हे नाईक यांचे मोठेच यश म्हणायला हरकत नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना आणि त्यातही राजकीय पुढाऱ्यांना मी विद्यार्थिदशेपासूनच कमी-अधिक प्रमाणात न्याहाळत आलो आहे. इतर काही नेत्यांबरोबर वसंतराव नाईक यांचीही इतक्या वर्षांनंतर मला आठवण होते याला तशी काही कारणेही आहेत. याचे पहिले कारण म्हणजे त्यांचा ऐटदारपणा. पुरेसे उंच, शरीरयष्टी आणि टापटीपपणा यांच्याबरोबरच चेहऱ्यावर अतिशय आकर्षक असे नाजूकसे हास्य. या हास्याच्या एका छटेनेच ते समोरच्या माणसाला आपल्याकडे खेचून घेत.
तरुणी किंवा स्त्रिया सुंदर असतात आणि त्यांच्या सौंदर्याची चर्चा लपतछपत तसेच काही वेळा उघडपणेही होत असते; परंतु तरुण आणि पुरुषही सुंदर असू शकतात याचे वसंतराव नाईक हे अतिशय बोलके उदाहरण होते, असे म्हणता येईल.
आपल्याकडील राजकारणी व त्यातही ग्रामीण भागातून आलेले राजकीय नेते हे अतिशय वाईट पद्धतीने सादर केले जातात. म्हणजे त्यांचा चेहरा उग्र, बेढब आणि ओबडधोबड दाखवला जातो. त्यांचे हातपाय नको तितके जाडजूड आणि पोटाचा घेर अवाच्या सव्वा, दाढीचे खुंट वाढलेले तसेच मिशा टोकदार अथवा झुपकेदार, धोतर किंवा पायजमा अधिकाधिक विटलेला, शर्ट किंवा सदरा अघळपघळ घातलेला असे नेत्यांचे चित्र साहित्यातून, व्यंगचित्रातून किंवा सिनेमातून सादर केले जाते. प्रत्यक्ष हे नेते अशा प्रकारे वाईट दिसणारे नसतात. इतकेच नव्हे तर त्यातील काही नेते खरोखरच टापटीप आणि सुंदरही होते आणि असतात. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब सावंत, विनायकराव पाटील, राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, बॅ. ए. आर. अंतुले अशी काही नावे या संदर्भात घेता येतील; परंतु या सर्वात मला आवडले ते वसंतराव नाईकच. त्यांना कधीही बघितले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी स्मितरेषा कायमच दिसायची आणि पाहणाऱ्याला आपलेसे करून घेण्याची विलक्षण ताकद या स्मितरेषेत होती.
वसंतराव नाईक यांचे आणखी एक वैशिष्टय़ असे की, त्यांचा पोषाख कमालीचा नीटनेटका, टापटीप व आकर्षक असायचा. ते खादीच वापरायचे. पण ती साधी खादी नव्हे तर थोडीशी उच्च प्रतीची. बहुतेक पँट व बुशशर्ट सिल्क खादीचेच असायचे. त्यांना जाकीट व टोपी घातलेली मी कधी बघितलेले नाही. परंतु काँग्रेस अधिवेशनात कधी तरी टोपी घालत असत, असे काहींचे म्हणणे आहे. या आकर्षक व ऐटदार पोषाखाला जोड मिळायची त्यांच्या हातात असणाऱ्या किंवा तोंडात शिलगावलेल्या ऐटदार पाइपची! कधी वाटलेच की ते पाइप शिलगावायचे. अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा! या पाइपात तंबाखू भरताना, तो पेटवताना आणि त्याचा झुरका घेताना ते खरोखरच समाधानी दिसायचे. त्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायचा! या त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याला साजेसेच त्यांचे हळुवार बोलणे असायचे. त्यांच्या या बोलण्यानेही अनेक जण त्यांच्याकडे ओढले जात.
या संदर्भातील एक घटना मला अजूनही आठवते. ही घटना आहे मुंबईच्या रुईया कॉलेजमधली. त्या वेळी मी पत्रकार नव्हतो, तर त्या कॉलेजचाच विद्यार्थी होतो. एक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाला नाईक तसेच त्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते त्या वेळी ते मुंबईच्या कॉलेजात प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच उपस्थित असावेत. त्यामुळे कॉलेजमधल्या आम्हा विद्यार्थी-विद्यार्थिनींत बऱ्यापैकी आकर्षण होते. ते दिसतात कसे. वागतात कसे, बोलतात कसे याबद्दल मोठे कुतूहल होते. साहजिकच आम्ही विद्यार्थी मोठय़ा उत्साहात आणि उत्सुकतेने मोक्याच्या जागा पटकावून बसलो होतो. ठरल्या वेळी नाईक पती-पत्नी आल्या. प्राचार्यानी त्यांचे आगत-स्वागत केले. हार-तुरे काही भेटवस्तूही दिल्या. त्यानंतर वसंतराव नाईक बोलायला उभे राहिले. बोलण्याच्या ओघात म्हणाले, ‘तुम्हा मंडळींना माहीतच असेल की, आम्ही दोघंही एकाच कॉलेजात होतो..’
मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वरील शब्द बाहेर पडतात न पडतात तोच विद्यार्थ्यांत हास्याची हलकीशी लहर उसळली! ही लहर थांबण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून आवाज आला, ‘साहेब, आता पुढचं काही सांगू नका. आम्हाला सर्व समजलं!’
विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियेवर सभागृहात हास्याचा धबधबाच कोसळला! या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांना थोडेसे कसेसेच झालेले दिसले; परंतु त्यांनी जरासे स्मितहास्य करतच विद्यार्थ्यांच्या त्या प्रतिक्रियेचे स्वागत केले. हात उंचावत ‘जरा थांबा, मला जरा पुढे बोलू द्या..’ असे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु विद्यार्थी, ‘नको, आम्हाला सर्व काही समजलं..’ असं म्हणून प्रेमादराने हात उंचावत होते. हे सर्व दृश्य मोठं मनोहारीच होतं. एरवी दुसरी एखादी व्यक्ती असती तर विद्यार्थ्यांकडून अचानकपणे आलेल्या प्रतिक्रियेने गडबडून गेली असती. पण नाईकसाहेब अजिबात डगमगले नाहीत आणि गडबडलेही नाहीत. त्यांनी तो सर्वच प्रकार, आताच्या भाषेत सांगायचे झाले तर, अगदी मस्तपैकी ‘एन्जॉय’ केला! या त्यांच्या आनंदात त्यांच्या पत्नीही हसतहसत सहभागी झालेल्या दिसल्या. अशाच प्रकारे नाईकसाहेबांची दुसरी एक आठवण माझ्या मनात घर करून आहे, ती मी पत्रकार म्हणून काम करत असतानाही. अर्थात त्या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार नव्हतो. परंतु माझ्या प्रत्यक्षदर्शी पत्रकार मित्रांनी सांगितलेली व त्या वेळी मुंबईच्या पत्रकार विश्वात काही दिवस घुमत राहिलेली. सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस यांचा एक आवडता ‘खेळ’ होता. ते मुंबईत असताना आणि मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट’च्या कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यातच नित्यनियमाने संप ठोकायचे. त्या काळात अशी पद्धत होती की, महापालिका कर्मचाऱ्यांनी किंवा गिरणी कामगारांनी आपापल्या मागण्यांसाठी संप केला की, मागण्यांवर अनेक दिवस चर्चा झडत राहायची. दोन्ही बाजूंकडील तिसऱ्या व दुसऱ्या फळीतील नेते हे चर्चेचे गुऱ्हाळ लांबवता येईल तेवढे लांबवायचे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून कधी तरी वाटाघाटी फिसकटवायचे. शेवटी अंतिम वाटाघाटीसाठी एका बाजूने कामगार संघटनेचे सर्वश्रेष्ठ नेते व दुसऱ्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री एकत्र यायचे. शेवटी तिढा सोडविण्याचे श्रेय अर्थातच मुख्यमंत्र्यांना मिळायचे. अशाच प्रकारच्या एका वर्षीच्या तिढय़ात महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने ‘संपसम्राट’ जॉर्ज फर्नाडिस व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक एकत्र यायचे होते. अंतिम वाटाघाटी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री ९ वाजता असे ठरले होते. त्यामुळे पत्रकार मंडळी रात्री ८-८.३० पासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डेरेदाखल झालेली होती. ठरल्याप्रमाणे जॉर्ज फर्नाडिस ९ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या शाही लवाजम्याने त्यांचे आगत-स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जॉर्ज पत्रकारांनाही भेटले. त्यांच्याबरोबर दोन-चार हास्यविनोद झाले. घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते. तास तर कधीच होऊन गेला. हळूहळू दुसरा तासही जाणार अशी चिन्हे दिसायला लागली. उपस्थितांपैकी सगळ्यांतच व त्यातही पत्रकारांत अधिकाधिक अस्वस्थता दिसायला लागली. नाही म्हणायला अधूनमधून मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा अधिकारी लगबगीने यायचा, जॉर्ज व त्यांच्याबरोबरच्या नेत्यांशी हास्यविनोद करायचा, ‘नाईकसाहेब कामात आहेत, दिल्लीहून काही मंडळी अचानकपणे आलेली आहेत. त्यांच्याबरोबर बोलणे सुरू आहे. ते संपताच आपलीच बोलणी सुरू व्हायची आहेत,’ असे सांगून वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
शेवटी अकरा-सव्वाअकराच्या सुमारास स्वत: नाईकसाहेबच हसतहसत बाहेर आले व जॉर्ज फर्नाडिस यांचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘माफ करा. मला थोडा उशीर झाला. दिल्लीहून काही माणसे अचानकपणे आली. त्यांच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते. आपणाला कळवण्याइतपतही वेळ मिळाला नाही. मी आपणाला दिलेली वेळ पाळू शकलो नाही, याबद्दल माफ करा..’ असं म्हणत त्यांच्या हाताला धरून ते त्यांना बैठकीच्या खोलीत घेऊन गेलेसुद्धा!
उपस्थित पत्रकारांत फोनसाठी धावाधाव सुरू झाली. ज्यांना फोन उपलब्ध झाला त्यांनी वाटाघाटी सुरू झाल्याची बातमी तर दिलीच; परंतु मधल्या दोन तासांच्या नाटय़ाचीही तिखट मसाला लावून फोडणी दिली!
हळूहळू मिनिट व तासकाटा पुढे-पुढे सरकू लागला. बाराचा ठोका पडला. त्यानंतर एकचा, दोनचा.. पत्रकारांनी कार्यालयाला फोन करून सांगून टाकले की, आता काही खूपच महत्त्वाचे घडले तरच फोन करू.. एरवी फोनची वाट बघू नका..
घडय़ाळाचे काटे पुढे सरकतच होते आणि पत्रकारांपैकी अनेकजण मिळेल ती खुर्ची वा टेबल पकडून जमेल तसे अंग ताणून निद्रादेवीपासून स्वत:ला वाचवायचा प्रयत्न करीत होते; परंतु काहींना ते अशक्यच झाले. त्यांच्या निद्रादेवीने असा काही ताबा घेतला की, त्यांच्या घोरण्याचा आवाज तेवढा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरच्या त्या शांत वातावरणाचा जमेल तसा भंग करत होता. अधूनमधून किती वाजले हे समजण्यासाठी काही जण अर्धवट झोपेत डोळे किलकिले करून घडय़ाळाकडे हताशपणे पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि निद्रादेवी त्यांना पुन्हा एकदा स्वत:च्या मिठीत सामावून घेत होती!
हे असे किती वाजेपर्यंत चालले हे आता नक्की लक्षात नाही. आठवते ते इतकेच की पहाटे साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि जॉर्ज फर्नाडिस बैठकीच्या खोलीतून बाहेर येत आहेत, असे कुणीतरी पुटपुटला. त्या क्षणाला एकजात सर्व पत्रकार निद्रादेवीच्या मिठीतून स्वत:ची सुटका करून घेऊन, जमेल तेवढय़ा ताकदीने व जागृतपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करून स्वत:ला सावरून बसले. काही क्षणांतच मुख्यमंत्री व जॉर्ज फर्नाडिस थोडेसे हसतहसतच बाहेरच्या व्हरांडय़ात आले, मात्र सर्वच पत्रकारांनी त्यांना गाठले..
‘वाटाघाटी यशस्वी झाल्या का?’
‘संप मिटला का?’
‘काय ठरले?’
अशा अनेक प्रश्नांची नुसती सरबत्ती सुरू केली. नाईकसाहेबांनी जॉर्जकडे बोट दाखवलं व हसत हसत म्हणाले, ‘साहेबांना विचारा.. काय झालं ते!’
त्यानंतर पत्रकारांनी आपल्या प्रश्नांचा मोर्चा जॉर्जसाहेबांकडे वळवला. प्रश्न तेच. त्यात फारसा जीव नव्हता; परंतु काही तरी कळावे अशी ओढ होती. जॉर्ज फर्नाडिस हसतहसत म्हणाले, ‘संपावर बोललोच नाही!’
जॉर्जच्या या उत्तराने सर्वच पत्रकार एकदमच थंड पडले. परंतु अंगातील रग आणि शिल्लक ऊब स्वस्थ बसायला देईना. काही ज्येष्ठ पत्रकारांनी थोडय़ाशा चढय़ा आवाजातच प्रश्न केला, ‘मग रात्री ११ ते पहाटे ५.३० पर्यंत आपण केलंत तरी काय?’
जॉर्ज फर्नाडिस म्हणाले, ‘महाराष्ट्राची व देशाचीही लोकसंख्या भरमसाट वेगाने वाढते आहे. या वाढत्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न पुरवायचे तर शेतीत हायब्रिड वापरल्याशिवाय पर्याय नाही, हे नाईकसाहेब मला पटवून देत होते. मला हा विषय तसा नवीनच असल्यामुळे मी आस्थेवाईकपणे त्यांचे म्हणणे ऐकत बसलो होतो. त्यांनी हा विषय मला मुळातूनच म्हणजे हायब्रिड म्हणजे काय इथपासून समजावून सांगितला. मध्यंतरी दोन वेळा चहा झाला आणि थोडे खाणेही!’
‘आणि संपाचं काय?’ पत्रकारांनी हसत हसत एकच गिल्ला केला.
‘संपाबद्दल बोलण्यासाठी आम्ही सकाळी ९ वाजता भेटण्याचे ठरविले आहे!’ या जॉर्जच्या म्हणण्याला मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार दिला आणि ते जॉर्जचा निरोप घेऊन बंगल्याचा आतल्या बाजूला निघूनही गेले. त्यानंतर दोन-चार हास्यविनोद करून जॉर्जही निघून गेले.
या अफलातून घटनेवर आम्हा पत्रकारांत पुढे कित्येक दिवस गप्पा रंगत होत्या. काही ज्येष्ठ आणि त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले पत्रकार तीच तीच घटना परंतु प्रत्येक वेळी अतिशय खुलवून सांगत. अशी घटना दुसऱ्या कोणा मुख्यमंत्र्याच्या आणि कामगार पुढाऱ्याच्या आयुष्यात घडली असेल असे मला वाटत नाही. या दृष्टीने वसंतराव नाईक धन्यच म्हटले पाहिजेत आणि कामगारांसाठी सदान्कदा भांडणारे तसेच शिरा ताणून भाषणे ठोकणारे जॉर्ज फर्नाडिस त्याहीपेक्षा सव्वापटीने धन्य म्हटले पाहिजेत.
या घटनेला आता कित्येक वर्षे होऊन गेली आणि आम्ही त्या काळातील काही पत्रकार कधी एकत्र आलो तर या घटनेची अधूनमधून आठवण करतोच! सर्वच जण या घटनेची पुन्हा एकदा उजळणी करून त्या घटनेचा आनंद पुन:पुन्हा लुटत असतो. अर्थात त्या काळातील पत्रकारही आता कमी कमी होत चाललेले आहेत. साहजिकच त्या घटनेचा आनंद लुटण्यावर खूपच मर्यादा आलेल्या आहेत. इतक्या वर्षांनंतर या घटनेची आता जेव्हा आठवण होते तेव्हा नाईक यांनी हे सर्व मुद्दामच घडवून आणलेले असावे, असे वाटायला लागते. कारण फर्नाडिस यांना सहा-सात तास संपाचा विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयात गुंतवून ठेवणे ही गोष्ट तशी सोपी नव्हती; परंतु ही कठीण गोष्ट नाईक यांनी घडवून आणली याचा अर्थच असा की, ती गोष्ट त्यांनी जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वकच घडवून आणलेली असणार. त्या काळात अन्नधान्याचा प्रश्न मोठा बिकट होता. शेतीचे उत्पादन मर्यादित आणि खाणारी तोंडे खूप व सतत वाढतच होती. साहजिकच केवळ आपल्या राज्यातीलच नव्हे तर देशासमोरील अन्नधान्य टंचाई हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अगदी सुरुवातीचा थोडा काळ सोडला तर त्यांच्या मंत्रिमंडळात पुरवठामंत्री म्हणून काम करणाऱ्यांच्या विरोधात मुंबईत तरी लोकांचे जवळजवळ दररोजच मोर्चे निघत असत. होमी जे. तल्यारखान आणि हरी गोविंद ऊर्फ भाऊसाहेब वर्तक या दोघांही पुरवठामंत्र्यांनी याचा त्या काळी भरपूर अनुभव घेतला होता. मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदींच्या नेतृत्वाखाली त्या काळी पुरवठामंत्र्यांचा व सरकारचा निषेध करण्यासाठी नवनवीन मोर्चे निघायचे. कधी नुसता घोषणांचाच मोर्चा, कधी महिलांचा लाटणे मोर्चा तर कधी थाळी मोर्चा! मुख्यमंत्री नाईक हे अशा मोर्चाच्या विरोधात होते. ते म्हणत, अन्नटंचाईचा प्रश्न मोर्चाने सुटणार नाही तर तो अधिक उत्पादन केल्यानेच सुटणार आहे. त्यासाठी सर्वानीच शेतीचे उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे आहे. राज्याची व देशाची सर्व शक्ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व शेतीचे उत्पादन त्यांच्याकडून कसे वाढवून घेता येईल यासाठीच खर्च केली गेली पाहिजे. मोर्चे, निदर्शने, हिंसक प्रकार यामुळे शक्ती वाया जाते, असे ते पुन:पुन्हा सांगत आणि सरकारला काही सांगायचे असेल, निवेदन द्यायचे तर पाचजणांनी येऊन द्या. सरकार त्यावर निश्चित व गंभीरपणे विचार करेल, असे म्हणत. पाच माणसांनी होणारे काम करण्यासाठी शेकडो-हजारो माणसांचा मोर्चा रस्त्यावर आणू नका. त्यामुळे सर्वानाच त्रास होतो. राज्याचे-राष्ट्राचे नुकसान होते, असेही ते म्हणत. अन्नधान्य टंचाईची, धान्य तुटवडय़ाची समस्या विरोधी पक्षीय नेत्यांनी आधी समजून घेतली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. मला वाटते हे सर्व सूत्र लक्षात ठेवूनच त्या दिवशी त्यांनी फर्नाडिस यांना वेगळ्या परंतु महत्त्वाच्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिका कामगारांच्या वेतनवाढीचे प्रश्न व त्यासाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरणारा संप या क्षणी महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा आपल्या राज्यापुढे, राष्ट्रापुढे महत्त्वाचे असे अनेक प्रश्न आहेत व त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे त्यांनी जॉर्ज फर्नाडिस यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. जॉर्ज फर्नाडिससारख्या कामगार क्षेत्रातील अव्वल दर्जाचा आणि राष्ट्रीय स्तरावरील नेता आपल्यासमोर आल्यानंतर त्याला देशस्थितीबद्दल, थोडय़ाशा आडमार्गाने का होईना चार गोष्टी सुनावण्याचे त्यांनी जे चातुर्य तसेच समयसूचकता दाखवली ती खरोखरच वाखाणण्याजोगीच होती. या दृष्टीने नाईक हे विरोधकांवर मात करण्यात खूपच तरबेज होते, असेही म्हणता येईल. त्यांना शिकारीचा छंद व आवड होती. याचा त्यांनी राजकारणातील विरोधकांना पळवून लावण्यासाठी, गप्प करण्यासाठी वा टिपण्यासाठीही उपयोग केल्याचे अनेकदा दिसून आले. एरव्ही ते खानदानी आणि थोडेसे शौकीनही होते.
अर्थात नाईक यांचे शेतीचे वेड हे मंत्री वा मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात निर्माण झालेले नव्हते. ते मुळातच शेतकरी होते. त्यांचा जन्मच मुळी खऱ्याखुऱ्या आणि हाडाच्या शेतकऱ्याच्या पोटी झाला होता. वडील फुलसिंग आणि आई होनूबाई यांचा मुख्य धंदा शेतीच होता. तो त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेला होता. त्यांच्या आजोबांनी आपले ‘गहुली;’ हे गाव अगदी निसर्ग सान्निध्यात वसवलेले होते. वसंतराव नाईक यांचा जन्म याच गावचा. खूप मेहनत करून भरपूर पीक घेण्याबरोबरच गाई, म्हशी, इतर जनावरांची उत्तम प्रकारे पैदास तसेच जोपासना करणे हाच या कुटुंबाचा मुख्य धंदा होता.
हे सर्व सांगण्याचा हेतू एवढाच की, अगदी लहानपणापासून वसंतराव नाईक यांच्यावर या कुटुंबातून उद्योग, परिश्रम, शेती, जनावरांची जोपासना इत्यादीविषयीचे संस्कार झालेले होते आणि ते शेवटपर्यंत तुटले नाहीत हे कळावे. शिक्षणाची मुळातच आवड असल्याने त्यांनी पहिल्या चार इयत्ता चार गावांत राहून व अनेक प्रकारचे अडथळे बाजूला सारून पूर्ण केले. ग्रॅज्युएट झाले. पुढे वकीलही झाले. ‘लोकांचे वकील’ म्हणून नावलौकिक मिळाला. वकिली करताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत होईल अशा पद्धतीची वकिली केली. त्याचबरोबर सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारे एक चांगले समाजसुधारक, भूदान कार्यकर्ते, काँग्रेस कार्यकर्ते, सहृदयी नेते म्हणूनही ते वाखाणले गेले.
या सर्व पाश्र्वभूमीवर वसंतराव नाईक सक्रिय राजकारणात सहभागी झाले तेव्हा काँग्रेसचे नेते, मंत्री, पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तेव्हा त्यांनी मांडलेले विचार, घेतलेली भूमिका. घेतलेले निर्णय आणि प्रत्यक्षपणे केलेली कामे ही सर्व गोरगरिबांच्या कल्याणाचीच होती हे सांगण्याची गरज वाटू नये. ते १९५२ ते ५७ पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९५७ ते ६० मुंबई राज्याच्या विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. १९६० ते ७७ ते महाराष्ट्र विधानसभेचे सभासद होते. मध्य प्रदेशात त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम केले. मुंबई राज्यात सहकार, शेती ही खाती त्यांनी हाताळली. १९६०-६३ ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले आणि यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदी आलेल्या मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर १९६३ ते ७५ या काळात म्हणजे तपभर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अगदी समर्थपणे भूषविले.
मुंबई प्रांतात सहकार खात्याच्या कामाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी पुष्कळ कामे केली. नदी-नाल्यांना बांध घालून ओलिताखालील जमिनीचे प्रमाण वाढवले. सहकारमंत्री म्हणून काम करीत असताना १९५७ मध्ये दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या द्विमतदारसंघातून कॉ. दत्ता देशमुख यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले आणि शेतकीमंत्री झाले. त्या वेळी मुख्यमंत्रीपदी असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना असे वाटत होते की, आपला देश मुख्यत: शेतीप्रधान आहे. शेतीच्या विकासातच राज्याचा व देशाचा विकास सामावलेला आहे, म्हणूनच शेतीव्यवसायावर नितांत श्रद्धा असणाऱ्या आणि शेतीविषयक प्रश्नांची सर्वतोपरी जाण असणाऱ्या नाईक यांच्यावरच शेतीखात्याची जबाबदारी देऊन त्यांनी त्यांच्या कर्तबगारीचा गौरव तर केलाच, परंतु आपले राज्य कुठल्या दिशेने जाणार आहे आणि आपल्या देशाने कुठल्या दिशेने प्रगती साधणे आवश्यक आहे हेसुद्धा दाखवून दिले.
प्रथम शेतकीमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री या नात्याने नाईक यांनी शेती क्षेत्राला व त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले. त्यांनी शेतकऱ्यांबरोबरच लोकजागृतीसाठी राज्यभर दौरे काढले. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही शेतीविषयक समस्यांची जाणीव करून दिली. जबाबदारी व कर्तव्य कसे पार पाडायचे याचे पाठ दिले. काही ठिकाणी नुसती भाषणे न करता शेतात उतरून प्रात्यक्षिके करून दाखवली. राज्याचा दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच नांगर धरतो, पेरणी करतो म्हटल्यावर लोक अचंबित तर झालेच, परंतु सर्व प्रकारचा आळस व नकार बाजूला सारून कंबर कसून कामाला लागले. जास्त पिके काढून जास्त अन्नधान्य उत्पादन करणे ही एक लढाई आहे व आपण ती जिंकलीच पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांचे दारिद्रय़, अज्ञान, रोगराई दूर होणार नाही असे ते वारंवार सांगत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या काळात त्यांनी अनेक योजना आखल्या व त्यांची सरकारी यंत्रणेकडून अंमलबजावणीही करून घेतली. दुष्काळी भागातील अपुरे रस्ते पूर्ण करणे, नवीन विहिरी व तळी खोदणे, वीज आलेल्या गावात विजेवर चालणारे पंप तातडीने पुरविणे, ग्रामदानात मिळालेल्या जमिनीचे ताबडतोबीने वाटप करणे, शेतकऱ्यांचा माल साठविण्यासाठी गोदामे बांधणे, सहकारी तत्त्वावर जिनिंग व प्रेस उघडण्यास प्रोत्साहन व प्राधान्य देणे, आरेच्या धरतीवर काही ठिकाणी दूध कॉलन्या स्थापन करणे, दुग्धक्रांती घडवून आणणे, शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे आणि बी-बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी एक ना दोन असंख्य कामे त्यांनी मार्गी लावली. याच काळात सुप्रसिद्ध वसंत बंधारे अस्तित्वात आले. कापूस एकाधिकार योजना सुरू झाली. इतरही धान्यांच्या भावांना हमी देण्यात आली. मुख्य म्हणजे काम नसलेल्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेने आता देशभर हात पसरले आहेत आणि कोटय़वधी शेतमजुरांना ती काम देत आहे. पण याचे मूळ वसंतराव नाईक यांच्या कारकीर्दीत आहे. त्या काळी सवरेदयी नेते वि. स. पागे यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली आणि नाईक यांनी मोठय़ा धाडसाने ती स्वीकारली. शेतीत संशोधन करून त्या क्षेत्राला आधुनिक रूप देण्यासाठी महात्मा फुले, डॉ. पंजाबराव देशमुख, मराठवाडा आणि कोकण (आता डॉ. बाळासाहेब सावंत) अशी चार कृषी विद्यापीठे त्यांच्याच प्रयत्नाने अस्तित्वात आली. शिवाय जपानच्या भातमंडळावर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभवाचा फायदा, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थायी समितीवरील अनुभव त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांत वाटला. अशा या त्यांनी केलेल्या चौफेर, डोळस आणि अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्राने १९७२ च्या दुष्काळावर मात तर केलीच, परंतु राज्यात हरितक्रांती घडवून या क्रांतीचा अग्रदूत बनण्याचा विक्रम नोंदवला. हा विक्रम मोडण्याची ताकद असलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होणे ही अतिशय अवघड अशीच गोष्ट आहे. कारण अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी वसंतराव नाईक यांनी १९६५ मध्ये जो १२ कलमी कार्यक्रम राबवला त्यातील काही कलमे तर त्यानंतर होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी एकालाही सुचली सुद्धा नाहीत. आणि चुकून सुचली असली तर त्यांना ओठाबाहेर काढण्याचे धाडस त्यांनी कधी केले नाही. यापैकी एक कलम होते उसाचे पाणी तोडून ते अन्नधान्याच्या पिकाला देण्याचे. प्रवरा व गोदावरी नदीचे उसाला दिले जाणारे पाणी नाईक यांनी त्या वेळी तातडीने बंद केले आणि ते अन्नधान्याच्या विकासासाठी देण्याचा आदेश दिला. अशाच प्रकारचे दुसरे कलम होते ऊस लागवडीखाली जमीन १० टक्क्यांनी कमी करण्याचे आणि त्या जमिनीत अन्नधान्याचे पीक घेण्याचे. महाराष्ट्राचे राजकारण व अर्थकारण आणि त्यावरील ऊस लॉबीच्या घट्ट पकडीची कल्पना ज्यांना आहे त्यांनाच वसंतराव नाईक यांनी त्या वेळी केलेल्या असाधारण धाडसाची व त्यासाठी मोजलेल्या राजकीय किमतीची कल्पना येऊ शकेल. या एका निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्राला त्यांनी अनेक राजकीय शत्रू निर्माण केले. अशा प्रकारचे धाडस करणारा मुख्यमंत्री त्यानंतर झाला नाही आणि आता तर असे काही कोणी करेल अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा बाळगण्यासारखेच आहे. वेळेवर पाऊस झाला तर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणारा, पेढे वाटत आनंद द्विगुणीत करणारा आणि पाऊस लांबला तर डोळ्याला रुमाल लावणारा मुख्यमंत्री आता होणे नाही.
कन्नमवार यांच्या आकस्मिकपणे झालेल्या निधनानंतर वसंतराव नाईक यांची १ डिसेंबर १९६३ रोजी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आणि ५ डिसेंबर १९६३ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या या पहिल्या शपथविधीनंतर त्यांनी केलेल्या भाषणात राज्याचा प्रमुख या नात्याने आपण काय करू इच्छितो याचे दिग्दर्शन केलेले आहे.
‘महाराष्ट्र हा भारताचा खङ्गहस्त आहे, असे आपण मोठय़ा अभिमानाने म्हणतो. देशभक्तीने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील तरुण मोठय़ा संख्येने संरक्षण दलात सामील झाले तरच हा आपला अभिमान सार्थ ठरणार आहे. तसेच राष्ट्र सर्वागीण समर्थ होण्यासाठी अन्न व औद्योगिक उत्पादनाची गती पूर्वी केव्हाही नव्हती अशी वाढली पाहिजे. शेती व औद्योगिक उत्पादन वाढविण्याचा प्रश्न हा या संदर्भात फार महत्त्वाचा ठरतो. या दृष्टीने आपण ज्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत त्यांच्या तपशिलात शिरण्याचे येथे कारण नाही. परंतु एका गोष्टीचा मात्र खास उल्लेख मी करू इच्छितो. शेतकऱ्याच्या कष्टाचे फळ त्याच्या पदरात पडावे आणि शेतीचे उत्पादन वाढून सहकारी तत्त्वावर उद्योगधंद्याच्या वाढीस चालना मिळावी म्हणून कृषी औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक अभिनव प्रयोग आपल्या राज्यातील काही कर्तृत्ववान शेतकरी आज यशस्वीपणे करीत आहेत ही खरोखरच महाराष्ट्राच्या गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या या प्रयत्नाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक नवे नेतृत्व निर्माण होत आहे. ग्रामीण भागाच्या अभ्युदयाचे एक नवे साधन, एक नवा मार्ग आपल्याला सापडला आहे. या प्रयत्नांना जास्तीत जास्त प्रोत्साहन व शक्य ते सर्व साहाय्य देणे हे महाराष्ट्र राज्याच्या शासनाचे धोरण राहील हे मी सांगू इच्छितो.’
राज्यापुढील अनेकविध प्रश्नांचा उल्लेख करून नाईक म्हणाले, कृष्णा-गोदा नद्यांचे पाणी वाटप आणि सीमातंटा हे प्रश्न तर संबंध महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे असे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविताना शासनाला सर्वाच्याच सहकार्याची गरज लागणार आहे आणि याकामी मला केवळ माझ्या पक्षाचेच नव्हे तर सर्व विरोधी पक्षांचे सहकार्य हवे आहे. हे प्रश्न अशारीतीने सर्वाच्या सहकार्याने सोडविण्याची भूमिका एकदा मान्य झाल्यावर त्याबाबत निदर्शने किंवा हरताळ यासारख्या मार्गाची गरजच उरत नाही. त्यामध्ये आपल्या शक्तीचा व काळाचा अपव्यय होऊ नये म्हणून दक्षता आपण घेतली पाहिजे. आपण आपली ही शक्ती देशापुढे दारिद्रय़ाची जी महान व बिकट समस्या आहे ती सोडविण्याच्या कामी केंद्रित केली पाहिजे.
माझ्या सरकारला सर्व कामात सर्व जनतेचे सहकार्य मिळावे व आपण सर्वानी जाणीवपर्वक प्रयत्न करून महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल घडवू असे आव्हान करून मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, आजवर महाराष्ट्र राज्य जसे भारतात नेहमी प्रगतीच्या आघाडीवर राहिले तसे ते यापुढेही राहील, अशी ईर्षां ठेवूया. माझी नवी जबाबदारी स्वीकारताना महाराष्ट्राच्या कर्तव्यनिष्ठ व कर्तृत्ववान जनतेचे आशीर्वाद मी मागतो.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेले हे भाषण समोर ठेवूनच वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या तिन्ही कारकीर्दीत सर्वसाधारणपणे राज्यकारभार केला. त्यांनी स्वीकारलेल्या भूमिका, घेतलेले निर्णय आज नजरेखालून घातले तर असे दिसते की, काही निर्णयांच्या बाबतीत त्यांना मोठे अभूतपूर्व असे यश मिळाले व या निर्णयांनी महाराष्ट्रातील जनतेची व म्हणूनच महाराष्ट्राची ताकद वाढली. उदाहरणार्थ शेती व शेतकरी यांच्याविषयी नाईक यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती होऊन हे राज्य तुटीच्या अवस्थेतून बाहेर पडू शकले. दूध उत्पादनाबद्दल हेच म्हणता येईल. गाय व म्हैस यांच्या दुधाला सारखा भाव, संकरित गाईच्या खरेदीसाठी कर्जाची व्यवस्था, आरे धरतीवर दुग्ध कॉलनी अशा काही निर्णयामुळे महाराष्ट्रात दुधाची किंवा धवलक्रांती होऊ शकली. १ जानेवारी १९६४ रोजी नाईक सरकारने नवे वास्तववादी दारूबंदी धोरण जाहीर केले. मुख्यत: नव्या पिढीला, तरुणांना दारूपासून दूर ठेवण्यासाठी आणि गोरगरीब तसेच तळागाळातील लोकांना या विषसदृश पेयापासून वाचविण्यासाठी सरकारने हे धोरण स्वीकारलेले होते. त्या काळी राज्यातील दारूबंदी उठवायला ज्येष्ठ सवरेदयी नेते आचार्य विनोबा भावे यांचा विरोध होता, परंतु नाईक यांनी विनोबांची भेट घेऊन त्यांचे मन या निर्णयाच्या बाजूने वळवले आणि शेवटी आपल्याला हवे असलेले धोरण अमलात आणले, परंतु हे धोरण मोठय़ा प्रमाणावर फसले. इतकेच नव्हे तर या धोरणाने राज्यात मोठा अनर्थ घडवून आणला, असेच म्हणायला हवे. हे धोरण जाहीर करताना सरकारने जे ध्येय समोर ठेवले होते, ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या ते ध्येय आणि त्या अपेक्षा कागदावरच राहिल्या. तरुण पिढीला दारूच्या दुष्परिणामापासून वाचवायचे हा या धोरणाचा मुख्य उद्देश होता. म्हणून ४० वर्षांवरील व्यक्तींनाच परवाने द्यायचे असे ठरले होते. आज परिस्थिती अशी आहे की, ४० वर्षांवरील व्यक्ती तर दारू ढोसतच आहेत, परंतु ‘१८ वर्षांच्या मुलांना दारू दिली जाणार नाही’ असे फलक लावलेल्या ठिकाणी १८ ते २५ वर्षांचे तरुण सर्रास दारू पिताना दिसत आहेत. अशी दृश्ये शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही बघायला मिळत आहेत. समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांना दारूच्या व्यवसनापासून दूर ठेवून त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार होते. कारण तसे आश्वासन हे धोरण जाहीर करतानाच सरकारने दिलेले होते, परंतु सरकारने या दृष्टीने फारसे काही केले नाही. उलट देशी दारूला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे मोसंबी, नारिंगीचा महापूर आला आणि त्यात ही गरीब बिचारी आर्थिकदृष्टय़ा मागासलेली जनताच आयुष्यभर गटांगळ्या खात राहिली. दारूचे व्यसन पुरुषापर्यंतच मर्यादित न राहता ते महिला वर्गातही पसरले. कारणे काहीही असोत या एका बाबतीत श्रीमंत घराण्यातल्या महिला आणि गरीब घरच्या स्त्रिया सारख्याच पातळीवर तरंगताना दिसतात. मध्यमवर्गीयात तर दारू हा स्टेटस सिंबॉल बनला आहे आणि सर्वसाधारणपणे सरकारी पातळीवरील कामे माया, दारू आणि दाराशिवाय होत नाहीत असा बोलबाला आहे. आता तर धान्य कुजवून त्याची दारू गाळण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.
मराठी ही महाराष्ट्रातील जनतेची भाषा आहे. तिचा वापर महाराष्ट्राच्या राज्य कारभारात येत्या वर्ष सव्वा वर्षांच्या आत सुरू होईल आणि त्याकरिता या संबंधीचे बिल आगामी अधिवेशनात मांडले जाईल. असे धोरणात्मक निवेदन १४ फेब्रुवारी १९६४ रोजी नाईक यांनी मुंबई येथे केले होते. या घोषणेचा दुसरा भाग म्हणजे बिल मांडणे वगैरे प्रत्यक्षात आला, परंतु ‘वर्ष सव्वा वर्षांच्या आत मराठीचा राज्य कारभारात वापर’ हा पहिला भाग मात्र आजही मोठय़ा प्रमाणावर पूर्ण होऊ शकला नाही, आजही या राज्याच्या भाषेचा प्रश्न अधांतरीच लोंबकळतो आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांत विशेषत: गेल्या दोन-तीन वर्षांत भाषाविषयक धोरणात इंग्रजीला जे अधिकाधिक आधिक्य मिळत चाललेले दिसत आहे त्यावरून मराठीचे सरकारदरबारीचे भवितव्य फारसे सुखावह आहे, असे म्हणता येणार नाही.
जुगार थांबविण्यासाठी केलेली लॉटरीची सुरुवात, साखर कारखान्यांना दिलेली दारू गाळण्याची परवानगी, कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी अशा आणखी काही धोरणांचे विश्लेषण करता येणे शक्य आहे, परंतु त्याची आवश्यकता नाही. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. त्यांच्या काही दमदार पावलामुळे महाराष्ट्राला शक्ती मिळाली. महाराष्ट्राचे देशातच नव्हे तर परदेशातही नाव झाले. हे सर्व खरे असले तरी त्यांनी केलेल्या एका कामामुळे त्यांची जिवंतपणी आणि त्यानंतरही खूप बदनामी झाली.
हे त्यांनी केलेले काम म्हणजे ‘बॅक बे रेक्लमेशन’चे काम. दक्षिण मुंबईच्या नरिमन पॉइंटजवळील समुद्रात भराव घालून जमीन मिळवायची आणि ती आकाशाला भिडणाऱ्या दराने विकून सर्व संबंधितांना अमाप पैसा मिळवून द्यायचा. असे पैसे लुटणाऱ्यांत राजकीय पक्ष, त्या पक्षाचे नेते, उद्योगपती, सरकारी अधिकारी, दलाल असे सगळेच असतात. सार्वजनिक मालमत्तेवर अशा प्रकारे दरोडे घालण्याचे प्रकार या मुंबईत आणि महाराष्ट्रात यापूर्वी घडले नाहीत असे नाही, परंतु ‘बॅक बे रेक्लमेशन’च्या रूपाने मुंबईत घातला गेलेला सार्वजनिक मालमत्तेतील हा दरोडा सर्वात मोठा असावा. कदाचित यापूर्वी अशा रीतीने घातले गेलेले काही दरोडे एकत्रित केले तरी त्या सर्वापेक्षा या दरोडय़ातून लुटण्यात आलेली रक्कम निश्चितच अधिक असावी! शिवाय या दरोडय़ामुळे सरकारचे व त्याद्वारे लोकांचे नुसते आर्थिक नुकसानच झालेले नाही तर मुंबईतील सर्वच आर्थिक व राजकीय सत्तास्थाने एकाच ठिकाणी आणि मुंबईच्या अगदी एकाच टोकाला एकत्रित झाल्याने याचे जनसामान्यांवर विविध प्रकारचे विपरीत परिणाम झाले. हे दुष्परिणाम सर्वच मुंबईकरांना आणि त्यांच्या पुढच्या पिढय़ांना आयुष्यभर भोगावे लागणार आहेत.
मुंबईत जागेचा तुटवडा आहे म्हणून मुंबईच्या एकाच बाजूच्या समुद्रात भराव घालून जमीन निर्माण करून त्यावर उद्योगधंदे, कार्यालये उभारू नका. त्यामुळे सर्व प्रकारच्या. सोयीसुविधांवर नको तितका ताण पडून सर्वच मुंबईकरांचे जीवन असह्य होऊन जाईल, असे मत राज्य सरकारनेच या संदर्भात वेळोवेळी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समित्यांनी व्यक्त केले होते, परंतु कारणे काहीही असोत नाईक आणि त्यांच्या सरकारने ही मते बाजूला सारली व ही योजना राबवली. मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील समाजवादी नेते व बडे खोत प. बा. ऊर्फ बाबुराव सामंत यांनी समाजवादी नेत्या व आमदार मृणाल गोरे यांना पुढे करून या योजनेविरुद्ध सभा, परिषदा, मोर्चे, निदर्शने इत्यादी मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन पेटविले. परंतु या सनदशीर आंदोलनाही सरकारने दाद दिली नाही. ‘बॅक बे रेक्लमेशन’चे हे प्रकरण जनांदोलनाने थांबवता येत नही असे लक्षात आल्यावर बाबुराव सामंत, मृणाल गोरे यांनी याविरुद्ध हायकोर्टात दाद मागितली. परंतु काही किरकोळ बाबी वगळता ठोस असा न्याय मिळालाच नाही. शेवटी नाईक यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वत:ला म्हणण्यापेक्षा मुंबई आणि मुंबईबाहेरील बडय़ा बिल्डरना हवे होते तेच केले. हे बडे बिल्डर आणि राजकीय नेते यांचे उखळ पांढरे झाले, परंतु मुंबईकरांचे जीवन कायमचे दयनीय होऊन गेले. या परिस्थितीला मुख्यमंत्री या नात्याने वसंतराव नाईक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असे आजही अनेक मुंबईकरांना वाटते. अर्थात माझ्या मते ते या प्रकरणी सर्वस्वी जबाबदार नसले तरी त्यांचा यात मोठा वाटा आहे. यात अनेक नेते गुंतलेले असणार. दिल्लीतील वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेते गुंतलेले असणार. राजकीय पक्षांचाही सहभाग असणार. उद्योगपती, दलाल आणि सरकारी अधिकारी असणार ही गोष्ट उघडच आहे. परंतु या सर्वाबरोबर वसंतराव नाईकही यात असणार ही गोष्ट उघडच आहे. या त्यांच्या निर्णयाने त्यानंतरच्या काळात मुंबई बिल्डरना आंदणच मिळाली. आता तर येथे बिल्डरांचे आणि बिल्डरांचेच राज्य आहे.
वरील सर्व गोष्टी खऱ्या असल्या आणि त्याबद्दल वसंतराव नाईक यांना आपण कितीही दोष देत असलो तरी एक गोष्ट नाकारता येणार नाही की ते कर्तृत्ववान मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरच नव्हे तर शेतीच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रावरही उमटवलेला आहे. या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अभूतपूर्व अशी आहे. या त्यांच्या कर्तृत्वाच्या आसपास जाईल असा त्यांच्यानंतर एकही मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेला नाही. याला अपवाद आहेत ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. परंतु यशवंतरावांनीच म्हटले आहे, ‘‘मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला असे अभिमानाने सांगण्यात आले. मी शेतकऱ्याचा मुलगा असलो तरी शेतकरी नाही. पण वसंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री लाभला आहे. त्यांनी राज्याच्या शेतकऱ्यांमध्ये जो विश्वास निर्माण केला त्यामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा गुंतागुंतीचा (शेतीचा व अन्नधान्याचा) प्रश्न आपण सोडवू शकू, अशी आशा निर्माण झाली आहे.
वसंतराव नाईक यांच्यानंतर शेतकऱ्यांची मुले व स्वत:ला शेतकरी म्हणवून घेणारे अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते नाईकांच्या पासंगालाही पुरले नाहीत.

जन्म : १ जुलै १९१३ (गहुली, पुसद)
मृत्यू : १८ ऑगस्ट १९७९
भूषविलेली अन्य पदे
सहकार, कृषी, महसूल खाती. (महाराष्ट्र राज्य)
राजकारणातील वारसदार
पुतणे सुधाकरराव नाईक (मुख्यमंत्री), पूत्र अविनाश (राज्य मंत्रिमंडळात काही वर्षे मंत्री),
पुतणे मनोहर नाईक (सध्या मंत्री), नातू निलय (यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष.)
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७
२ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२
१३ मार्च १९७२ ते २० फेब्रूवारी १९७५
पक्ष: काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये पुसद मतदारसंघ

राधाकृष्ण नार्वेकर,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

मारोतराव कन्नमवार (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



साहिब और साहिबान, दिल्ली यकिनन
ना-मेहरेबाने शहर है।
अशा या ‘निर्दय नगरी’ची मेहरेनजर आपल्याकडे वळावी आणि स्थिरावी, यासाठी भारतीय लोकजीवनातील सर्व घटक किती आतुर असतात, कसे दबा धरून बसतात आणि कशी ‘हिरनकूद’ मारतात, हे काय सांगावे! पण, या राजधानीला दयेचा पाझर तेव्हाच फुटतो जेव्हा तिचे कुठे काही अडले असेल! लोकमान्य टिळकांनी हे सत्य अचूक हेरले होते म्हणून ते म्हणायचे, ‘दिल्लीच्या गरजा येती आमच्या काजा.’

अशीच कुठली तरी गरज दिल्ली दरबारी निकडीची ठरली आणि महाराष्ट्र स्थापनेचा, १ मे १९६० हा मुहूर्त पक्का झाला पण, तो क्षण उगवता उगवता रक्ताचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते. ऊर फाटून गेला होता. जीव अनेकदा अधांतरी टांगला गेला होता.
अशाच एका अधांतरी क्षणी तत्कालीन मुंबई राज्यातील (१९५५ च्या सुमारास) मराठी आमदार, खासदार आणि मंत्री यांनी आपल्या पदांचे राजीनामे पंतप्रधानांना, एकत्र सामूहिकरीतीने सादर करावयाचे ठरवले. त्यात एक आमदार आणि एक खासदार निरनिराळ्या कारणावरून सामील नव्हते. आमदार म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा पंडितजींच्या हाती तुमचे राजीनामे द्याल, त्याचवेळी मी माझा राजीनामा त्यांच्या हाती देईन.’ ते सर्वाबरोबर पंडितजींच्या भेटीला गेले होते.
खासदार म्हणाले, ‘मी तुमच्या बरोबर येणे, नेहरूंशी माझे जे संबंध आहेत त्याशी अनुचित होईल. तुम्ही नेहरूंना भेटाल त्या क्षणी माझा राजीनामा त्यांच्या हातात राहील, अशी व्यवस्था करतो’ तशी व्यवस्था झाली होती.
पण, त्या निर्दयी दरबाराने मराठी आमदार-खासदारांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. इतकेच नव्हे तर, त्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही पण, खासदाराचा राजीनामा पंडितजींच्या हाती पोहोचला होता आणि तो त्यांनी परत घेण्याचे निश्चयाने नाकारले. आमदाराने पंडितजींचा, मोठय़ा हुशारीने एकटय़ानेच निरोप घेतला. म्हणाला, ‘पंडितजी आपण माझ्या जागी असता तर काय केले असते?’
पंडितजी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘नेत्यावर विश्वास ठेवला असता.’
आता पहा काळाचा महिमा.
खासदाराने संसद भवनात लोकसभा सभागृहात मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे कारण सांगताना ‘येथे महाराष्ट्राविषयी आकसच आहे’ असा घणाघाती घाव घातला आणि संपूर्ण भारत सरकारचे आसनच डळमळीत झाले. ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे. मग काय, ‘स्वतंत्र मुंबई’ची योजना बुडाली अरबी समुद्रात-अगदी तात्काळ! विदर्भाचे वेगळे राज्य फाजल अली कमिशनच्या दप्तरातून बाहेर आलेच नाही! संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात या दोन्ही ‘मागण्या’ बस्त्यात बांधल्या गेल्या. उलट, सर्व मराठी आणि सर्व गुजराती लोकांना एकत्र बांधणारे ‘महाद्विभाषिक राज्य’ निर्माण झाले.
भारत सरकार संसदेला शरण गेले! हे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर, आजवर, कधीही घडलेले नाही!
पण, काळाचा महिमा पुढे असा की, या सर्व पेचप्रसंगातून एका आमदाराचा (यशवंतराव चव्हाण यांचा) ‘भाग्योदय’ झाला आणि एका खासदाराचा ( चिंतामणराव देशमुख यांचा) ‘सत्ताऱ्हास’ झाला! त्यांची सर्व सत्ता पणाला लागली.
००००
या महाद्विभाषिकाचे राज्यपाल म्हणून श्रीश्रीप्रकाश हे १९५६ ते १९६० या कालखंडात मुंबईच्या राजभवनाचे रहिवासी होते. त्यांच्याऐवजी कोणी दुसरा महापुरुष राज्यपाल झाला असता तर काय झाले असते, हे सांगणे कठीण आहे. पण, श्रीप्रकाश असल्यामुळे काय झाले ते सांगतो.
त्याचे असे झाले.
विनोबाजींच्या भारतव्यापी पदयात्रेत त्यांचे पाय ज्या ठिकाणी मराठी भूमीवर पडणार होते, त्याच ठिकाणी त्यांना गाठून संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचा पाठिंबा मिळवायचा, असा मनसुबा होऊन संयुक्त महाराष्ट्र समितीचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ श्रीधर महादेव यांच्या (एस.एम. जोशी यांच्या) नेतृत्वाखाली तेथे पोहोचले. आचार्य विनोबाजी हे फार दूरगामी विचार करत होते. ‘भाषिक राष्ट्रवादा’चा सिद्धांत मुळातच त्यांना अमान्य होता. म्हणून या शिष्टमंडळाला त्यांनी विचारले, ‘तुमची मागणी अखेर फेटाळली गेली तर तुम्ही काय कराल? देशातून फुटून निघाल?’ या अनपेक्षित प्रश्नाने सर्वजण सुन्नच झाले पण, क्षणात आपला हजरजबाबीपणा शाबूत ठेवीत ‘एस.एम.’ म्हणाले, ‘हो. फुटून निघू.’
झाले. बैठक संपली. विनोबाजींनी सर्वाना बसल्या जागीच निरोपाचा नमस्कार केला.
हा प्रकार नेमका काय घडला, हे जाणून घेण्यासाठी श्रीप्रकाश यांनी मला बोलावून घेतले. ( त्यांची माझी मध्यप्रदेशच्या काळातच चांगली दाट ओळख झाली होती. महिना दीड महिन्याने कधीतरी त्यांचा निरोप आला की, मी त्यांच्या भेटीस जात असे.) मी म्हणालो, ‘जे आपल्याला कळले आहे ते सर्व खरे आहे. ( मी विनोबाजी- एस.एम.भेटीच्या वेळी तेथेच होतो.)
ते म्हणाले, ‘हे घडू शकेल? तुम्हाला काय वाटते?’
मी म्हणालो, ‘आज तर तसे वाटत नाही. कारण, प्रश्नाचे अंतिम उत्तर मिळायचे आहे. ते जर अन्यायकारक असेल तर काहीही होऊ शकते. कारण, अशा फुटीरपणाचा फायदा घ्यायला जगातील अधिसत्ता उत्सुकच आहेत.’
आणि त्या दिवशी मी नि:शब्द होऊन परतलो.
पुढे त्यांची माझी अशीच दोनदा भेट झाली पण, हा विषय मी काढला नाही, पण एके दिवशी अचानक त्यांचे बोलावणे आले म्हणून गेलो. चहा होईपर्यंत इतरच गोष्टी झाल्या, पण मी निरोप घ्यायला उठलो तर मला म्हणाले, ‘इट इज नॉट अ डय़ुरेबल कमॉडिटी!’
(हे द्विभाषिक काही टिकाऊ संस्थान नाही !)
राज्यपालांनी असा निर्वाळा अचानकपणे माझ्या माथी मारल्यामुळे माझे विचारचक्र वेगाने धावू लागले. याचा अर्थ उघड उघड ‘हे द्विभाषिक मोडीत काढा’ असाच होत होता- आणि हा सल्ला ते फक्त भारत सरकारलाच देऊ शकतात! अवघ्या पाच-सात मिनिटात माझ्या अंत:करणात लख्ख प्रकाश पडला.
मी राजभवनातून पायीच ‘सह्य़ाद्री’कडे पोहोचलो पण, यशवंतराव आलेले नव्हते. म्हणून तसाच पुढे वानखेडेंच्या बंगल्यावर पोहोचलो. ते नुकतेच आले होते. म्हणाले, ‘बस, मी तोंड धुऊन येतो. मग चहा पिऊ.’
चहा पिता पिता मी सहजपणे म्हणालो, ‘मला असं कळलंय की, हे राज्य फार काळ टिकू शकणार नाही, असा राज्यपालांचा ‘रिपोर्ट’ दिल्लीला गेला आहे.’
‘तू म्हणतोस म्हणून विश्वास ठेवतो, पण त्या थेरडय़ाला काय कळते? त्याचा रिपोर्ट केराच्या टोपलीत गेला असेल,’ वानखेडे म्हणाले.
इकड-तिकडच्या गोष्टी करत तिथे अर्धा तास घालवला आणि पुन्हा सह्य़ाद्रीवर पोहोचलो.
चारपाच जणांशी बोलल्यावर यशवंतराव म्हणाले, ‘बोल आता’
मी वानखेडे यांना जेवढे सांगितले तेवढेच त्यांनाही सांगितले.
दोन चार मिनिटे स्तब्ध राहून ते मला म्हणाले, ‘मला हे खरं वाटत नाही पण, म्हातारा फार घाग आहे. तुझी बातमी कुठची?
मी म्हणालो, ‘दिल्लीची.’
त्यावर म्हणाले, ‘मी अंदाज घेतो. नंतर बोलू’
आठ दिवसांनी यशवंतरावांनी सांगितले की, ‘तुझी बातमी खरी आहे पण, ती ‘माय डिअर जवाहर’ आणि ‘युवर्स श्रीप्रकाश’ अशा खाजगी स्वरूपातली आहे! काही लक्ष देऊ नकोस. द्विभाषिक आणखी दहा वर्षे तरी चांगले चालेल.’
नंतर, दिल्लीतून वेगाने घटना घडू लागल्या. इंदिराजींचा महाराष्ट्र दौरा (पश्चिम महाराष्ट्र) ठरला आणि पार पडला यशस्वीपणे. महाराष्ट्र झाला तर काँग्रेसला पुन्हा बरे दिवस येतील, असे वातावरण दिल्लीत तयार झाले.
श्रीप्रकाश हे विनोबा-एस.एम. संवादामुळे अस्वस्थ झालेले मी पाहिले म्हणून मी सावध झालो. श्रीप्रकाश हे जर राज्यपाल नसते, तर विनोबांनी भाषिक राष्ट्रवादाचा जो धसका घेतला होता तो त्या दुसऱ्या राज्यपालाला तेवढा जिव्हारी लागला असता का? अनेकदा मला असे वाटत आले आहे की, श्रीप्रकाशांच्या अभावी मुंबई-महाराष्ट्रातील परिस्थिती विकोपाला गेली असती, चिघळली असती आणि कदाचित भारतीय उपखंडातील पहिला शेख मुजिब्बर रहमान होण्याचा मान एस.एम. जोशींच्या गळ्यात पडला असता!
हे कपोलकल्पित नाही. त्यास वास्तवाचा आधार आहे. आज तो सांगूनच टाकतो.
००००
गोवा प्रदेश काँग्रेसची पुनर्घटना करण्यासाठी, सर्वसंमतीची घडण करण्यासाठी, दिल्लीहून एआयसीसीने शिवशंकर यांना ‘प्रशासक’ म्हणून नियुक्त केले होते. मी त्यांचा अधिकृत सहाय्यक म्हणून गोव्यात जवळजवळ सहा महिने वावरत होतो. या कामात त्यांची मदत करताना साळगावकर, बांदोडकर, ढेपे आदी उद्योगपतींचे सहकार्यही मिळवावे लागले होते. अखेरीस भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुचवलेल्या काटकारबाईंच्या नावावर मतैक्य झाले! या सर्व गडबडीत एके दिवशी भाऊसाहेब बांदोडकर म्हणाले, ‘उद्या आहे मंगळवार. मंगेशीला पोहोचा. दुपारी दोननंतर जेवू आणि बोलू.’
जेवण झाल्यावर भाऊसाहेब म्हणाले, ‘जरा फिरून येऊ’ चारच वाजले होते.
थोडी झाडी पाहून आडोसा बरा आहे, असे योजून एका दगडावर भाऊसाहेब बसले आणि दुसऱ्या दगडाकडे बोट करून म्हणाले, ‘बसा’ दोन दगडांमध्ये दोन फुटांचेदेखील अंतर नव्हते.
जवळजवळ अर्धा तास ते फक्त मलाच ऐकू येईल, अशा हळू आवाजात रशियन सरकारच्या गोव्यातील कूटनीतीची माहिती मला देत होते. शेवटी ते म्हणाले, ‘आठ दिवसांपूर्वी रशियन राजदूत पोपोव येथे आले होते. मी त्यांना जेवायला बोलवावे, असा सल्ला मला मोठय़ा हुशारीने, भारतीय परराष्ट्र खात्यामार्फतच देण्यात आला होता. आमचा जेवणाचा कार्यक्रम चाळीस पन्नास मिनिटे चालला. त्यात त्यांनी आश्वासन दिले. आपण होऊन की, ‘गोवा हे हिंदूराष्ट्र म्हणून जाहीर करा आणि भारतातून स्वतंत्र व्हा, आम्ही सर्व मदत तुम्हाला करू. तुम्ही पुढाकार घ्या. ‘आता हे मला फक्त इंदिराजींच्या कानावर घालायचे आहे, म्हणून तुम्हाला बोलावून घेतले. इंदिराजींना म्हणावं त्यांनी परराष्ट्र खात्यात कोणाशीही ही गोष्ट बोलू नये.’
मी हा निरोप इंदिराजींना पोहोचवला. त्यांनी तो अन्य कोणालाही सांगितला नाही आणि मी तर नाहीच नाही. आज ते गौप्य उघड केले आहे.
ही घटना आहे १९७२ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील. इंदिराजींनी आणीबाणीचा जो कठोर निर्णय केला. त्यास जी प्रमुख कारणे होती, त्यातील एक कारण हे होते.
सारांश काय, तर महाराष्ट्राने मुंबईसह भारतातून फुटून निघावे, अशी योजना करण्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा डाव पडलाच नसता, असे म्हणता येत नाही!
००००
मानवी जीवनाचे एक नाटय़पूर्ण, कधी विलोभनीय तर कधी शोकग्रस्त, असे एक अविभाज्य अंग म्हणजे त्याची नियती बहुधा अनपेक्षित तेच घडवीत असते. कोणाला माहीत होते चीनचा हल्ला १९६२ साली होणार आहे! पण, ते घडले आणि यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीस पाचारण करण्यात आले. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचे नाव निश्चित झाले. उद्या शपथविधीला कोणत्या रंगाचा सूट घालावा, याचा निर्णय ‘वर्षां’ बंगल्यावर होत असताना मीही त्यात सहभागी होतो. ते सर्व आटोपून तोंड गोड करून मी नऊ-साडेनऊच्या सुमारास कन्नमवारजींच्या बंगल्यावर पोहोचलो.
ते जेवणासाठी माझी वाटच पाहात होते. जेवण झाल्यावर म्हणाले, ‘मला मिळालेल्या आश्वासनाचा सर्वानाच विसर पडला आहे. तुम्हाला पण!’
मी पटकन दिल्लीला शास्त्रीजींकडे फोन लावला. मी मुंबईहून कन्नमवारजींच्या निवासस्थानावरून बोलतो आहे. ‘मला शास्त्रीजींशी ‘र्अजटली’ बोलायचे आहे’ असे सांगितले. थोडय़ा वेळाने फोन आला आणि शास्त्रीजी म्हणाले, ‘क्या बात है?’
मी- ‘कन्नमवारजी को आपने आश्वस्त किया था की, चव्हाणजी के बाद आपकोही मुख्यमंत्री बनाएंगे’
शास्त्रीजी- ‘अच्छा हुआ आप ने याद दिलाया. दस मिनिटमें फिर बोलता हूँ।’
दहा मिनिटांनी फोन खणाणला. मी उचलला. तिकडून शास्त्रीजी म्हणाले, ‘कन्नमवारजी को फोन दिजिए’
कन्नमवारजी- ‘प्रणाम शास्त्रीजी.’
शास्त्रीजी- ‘अभिनंदन! कल शपथ आप लेंगे!’
कन्नमवारजी- ‘मैं आपका बहुत ऋणी हूँ।’
शास्त्रीजी- (मला) ‘आप को धन्यवाद! याद नहीं दिलाते तो हमारे हाथ से अन्याय हो जाता!’
हे आश्वासन खुद्द पं. गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी दिले होते. त्यावेळी शास्त्रीजींच्या समवेत मीही उपस्थित होतो पण, कन्नमवार यांचे राजकीय चातुर्य हे की, त्यांचे नाव पक्के होईपर्यंत आणि मी भेटेपर्यंत त्यांनी एक चकार शब्द कुठे काढला नाही आणि अशा रीतीने ती आठवण दिल्यावर ऐनवेळी शेवटच्या क्षणी, सर्व काही बदलून गेले.
कन्नमवारजींची ही राजकीय धुरीणता महाराष्ट्राला आणि यशवंतरावांना मुळातच माहीत नव्हती. मोठय़ा द्विभाषिकात असताना कन्नमवारांना न विचारता न सांगता यशवंतरावांनी चांदा, भंडारा, वर्धा, नागपूर येथील कलेक्टर आणि डी.एस.पी.च्या बदल्या केल्या. कन्नमवार काहीच बोलले नाहीत. आठ-दहा दिवसांनी मला म्हणाले, ‘चला माझ्याबरोबर.’
सतत पाच दिवस सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांचा दौरा करून झाल्यावर साताऱ्यात थांबले. यशवंतरावांच्या मर्जीत नसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटले. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि यशवंतरावांच्या विश्वासातील तहसील डॉक्टरांच्या बदल्या करून टाकल्या.
त्यानंतर कन्नमवारांना विचारल्याशिवाय एकही बदली यशवंतरावांनी विदर्भात केली नाही.
असाच एक गमतीचा किस्सा ते मुख्यमंत्री होते, त्यावेळचा सांगण्याजोगा आहे.
प्रश्न होता, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करण्याचा. दिल्लीला येताना एका भेटीत ते ती फाईल घेऊन आले. यशवंतरावांचा सल्ला घ्यायला म्हणून. त्या फाईलवर एकच नाव होते- डॉ.आर.व्ही. साठे!
यशवंतरावांपुढे फाईल ठेवली तर ते म्हणाले, ‘डॉ. साठे फार सज्जन गृहस्थ आहेत. ते काही अशा उपद्व्यापात पडणार नाहीत. आपण दुसरे नाव शोधा.’
त्यावर कन्नमवारजी म्हणाले, ‘त्यांचे माझे बोलणे झाले आहे. ते तयार आहेत.’
यशवंतराव निरुत्तर!
राजकीय डावपेचात कन्नमवार कोणापेक्षाही कमी नव्हते. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांशी ते प्राप्त परिस्थिती विषयी उपस्थित प्रश्नांविषयी, संभाव्य संकटाविषयी आदराने चर्चा करत. त्यामुळे कुठल्याही कलेक्टरपेक्षा त्या त्या जिल्ह्य़ाची अधिक माहिती त्यांना असे.
द्विभाषिक अस्तित्वात आल्यानंतर विदर्भाचे पहिले कमिशनर म्हणून लक्ष्मणराव राजवाडे (आयसीएस) यांची नेमणूक झाली. ते जवळ जवळ एक महिनाभर कन्नमवारांना मंत्री असतानाही भेटलेच नाहीत. मी त्यांना म्हणालो, ‘हे बरोबर नाही. कसेही असले तरी ते पुढारी व मंत्री आहेत.’
राजवाडे रागाने लाल झाले होते.
पुढे एके दिवशी कन्नमवारजी मुक्कामाला नागपुरात होते. बरोबर १० वाजता ते कमिशनर ऑफिसमध्ये राजवाडे यांच्या खोलीसमोर उभे झाले. चपराशी धावत आत गेला आणि सांगितले. ते म्हणाले, ‘येऊ देत.’
कन्नमवाराजी आत गेले आणि राजवाडे यांच्या टेबलापाशी जात म्हणाले, ‘महंमद येत नाही तर नाही. आता हिमालयच महंमदाच्या भेटीस आला आहे.’
लक्ष्मणराव राजवाडे तात्काळ उभे झाले आणि म्हणाले, ‘माफ करा. येणारच होतो भेटीला पण, योग जुळत नव्हता. आपण आलात चांगले झाले.’
नंतर फार तर सहाच महिने ते कमिशनर म्हणून विदर्भात होते पण, त्या अल्पावधीत त्यांच्याकडून नंतर कन्नमवारांचा उपमर्द कधीच झाला नाही.
पण, कन्नमवारांच्या राजकीय कर्तृत्वाची खूण म्हणजे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ात रत्नाप्पा कुंभार यांच्या पाठीशी शक्ती उभी केली. कन्नमवार एकाच वर्षांत गेले पण, रत्नाप्पांच्या पाठीशी जी शक्ती त्यांनी उभी केली ती रत्नाप्पांना पुढील तीस वर्षे बळ देत राहिली.
कन्नमवारजी गेले त्यावेळी मी दिल्लीत होतो. त्यांच्या अंत्ययात्रेला मी पोहोचू शकत नव्हतो पण, त्या दोन-तीन दिवसात ‘कन्नमवारांच्या नंतर कोण’ म्हणून तर्कवितर्क होत होते. अण्णासाहेब शिंदे तेथे राज्यमंत्री होते. ते मला म्हणाले, ‘तुम्ही पंडितजींना माझे नाव द्या. तुम्ही सपोर्ट केला तर मी मुख्यमंत्री होतो.’
मी म्हणालो, ‘निर्णय केव्हाच झाला असेल पण, तरीही गुंजाईश असेल तर मी बोलेन’ दुसरे मुख्यमंत्री पदाचे इच्छुक होते शंकररावजी मोरे. म्हणाले, ‘महेशराव आता माझे काय राहिले आहे. तुम्ही पंडितजींना सांगाल तर ते नक्की ऐकतील.’
मी हसलो आणि म्हणालो, ‘मी स्वत:ला एवढा मोठा समजत नाही.’
कन्नमवारजींच्या नंतर ‘कोण’ हा प्रश्नच नव्हता. ज्यांच्या नावाला त्यांनी ‘खो’ दिला होता, ते वसंतराव नाईक प्रथमपासूनच पंडितजींची निवड होती. कुठेही चर्चा न होता, यशवंतरावांशीही न बोलता, वसंतरावांचे मुख्यमंत्रीपद ठरून गेले होते.
००००
यशवंतराव आणि दिल्ली यांचा १९५४ ते १९७४ असा घनिष्ठ संबंधाचा काळ. त्यातील पहिली दहा वर्षे कन्नमवारांच्या सहवासाची आणि दुसरी दहा वर्षे वसंतराव नाईकांच्या सहवासाची. म्हणजे, दिल्ली-यशवंतराव-कन्नमवार असा तरी त्रिकोण होता किंवा यशवंतराव-दिल्ली-वसंतराव नाईक असा तरी त्रिकोण होता पण, हा ‘दिल्ली-पं.महाराष्ट्र-विदर्भ’ राजकीय समन्वय याच वीस वर्षांत महाराष्ट्राच्या समाजजीवनातून, कापूर उडून जावा, तसा उडून गेला. त्याची जागा जातीय समन्वयाने याच वीस वर्षांत भरून काढली. महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठी जात आपापले महाराष्ट्रव्यापी संघटन करून मोकळी झाली. मराठा, माळी, तेली, ब्राह्मण आदी जाती विभागीय मर्यादेतून मुक्त झाल्या आणि आता तर जागतिक पातळीवर आपापले सामथ्र्य सिद्ध करत आहेत. यात दिल्लीशी कोणाचाच ‘कोण’ होऊ शकत नसल्याने जुन्या त्रिकोणाचे अघोषित विसर्जन झाले आहे.

जन्म : १० जानेवारी १९०० (चांदा, चंद्रपूर)
मृत्यू : २४ नोव्हेंबर १९६३.
भूषविलेली अन्य पदे
दळणवळण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खाती (महाराष्ट्र राज्य).
आरोग्य (१९५२ ते १९६० मध्य प्रांत)
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
पक्ष : काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघ.

महेश जोशी,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

यशवंतराव चव्हाण (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)

यशवंतराव चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालखंड हा विशाल द्बैभाषिक मुंबई राज्य (१ नोव्हेंबर १९५६ ते १ मे १९६०) आणि नवनिर्मित महाराष्ट्र राज्य (१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२) मिळून साडेसहा वर्षांचा, महाराष्ट्र निर्माण झाल्यावर ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले. २३ नोव्हेंबरला त्यांचा भारताचे संरक्षणमंत्री म्हणून शपथविधी झाला. व्यक्तिश: स्वत: यशवंतराव आणि नवनिर्मित महाराष्ट्र यांच्या संदर्भात बोलायचे तर अडीच वर्षांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हाच त्यांच्या व महाराष्ट्राच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा कालखंड होय. तथापि त्यांच्या या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना अडीच वर्षांपुरते सीमित न राहता द्वैभाषिकाचे मुख्यमंत्रीपद आणि त्याआधीची जडणघडण विचारात घेतली नाही तर हे मूल्यमापन अपुरेच राहील.

त्याचे कारण असे की वादग्रस्त द्बैभाषिकाच्या काळातील वादळी घडामोडीतून झालेली महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक ऐतिहासिक गोष्ट होती आणि त्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे सर्वसामान्य पद-हस्तांतर नव्हते. त्यामुळे चव्हाणांचे द्वैभाषिकाच्या काळातील कर्तृत्व व राजकारण तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा नव्या राज्यावर खोल परिणाम होणार होता.
चव्हाणांची द्बैभाषिकाच्या मुख्यमंत्रीपदी निवड होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना होती. जडणघडणीचा बहुतेक काळ ग्रामीण भागात घालविलेला, गरीब भूमिहीन कुटुंबात जन्म झालेला, सत्ता, राजकारण, शिक्षण, आर्थिक बळ यांचा कोठल्याही प्रकारे पाठिंबा नसलेला आणि वंशपरंपरा नसलेला माणूस केवळ स्वत:च्या कर्तृत्वबळावर आजपर्यंत एवढय़ा महत्त्वाच्या सत्तास्थानी भारतात कधी आला नव्हता. मुंबई व महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात त्या वेळी सुशिक्षित, शहरी बुद्धिजीवी मध्यमवर्गाचे आणि व्यापारी व भांडवलदार वर्गाचे वर्चस्व होते. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामीण धनवान किंवा सरदार कुलीन जमीनदार होते खरे. अशा परिस्थितीत ज्याच्या आईने मुलाच्या शिक्षणासाठी अक्षरश: मोलमजुरी केली आहे असे शेतकऱ्याचे पोर मुख्यमंत्रीपदी येणे ही साऱ्या वातावरणाला कलाटणी देणारी आणि भारतीय लोकशाहीची सक्षमता अधोरेखित करणारी घटना होती. स्थानिक राजकारणाच्या गदारोळात शहरी महाराष्ट्रामध्ये या वैशिष्टय़ाची फारशी दखल घेतली गेली नसली तरी देशपातळीवरील नेत्यांचे आणि देशी-विदेशी पत्रकारांचे निश्चितच या गोष्टीने लक्ष वेधले.
सारा गुजरात आणि विदर्भ- मराठवाडय़ासह महाराष्ट्र अशा विशाल द्वैभाषिकाचे राज्य चालविणे आणि तेही दोन्ही भाषिक समूहांच्या स्फोटक आंदोलनांच्या पाश्र्वभूमीवर, ही नुसती तारेवरची धाडसी कसरत नव्हती तर रक्तबंबाळ करणारी, जीवघेणी ठरू शकणारी लढाई होती. चव्हाणांनी सर्व बाजूंनी घाव झेलत हा काटेरी मुकुट शिरावर लीलया तोलून धरला. आता इतिहासात मागे वळून पाहिले तर त्या काळात चव्हाण मुख्यमंत्रीपदी असणे आणि विभाजन झाल्यावरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड होणे ही मोठी घटना होती. त्यांच्या जागी दुसरे कोणीही असते तरी त्याला त्या वादळी आंदोलनाने भुईसपाट केले असते. विभाजन एवढय़ा सुखासुखी लोकशाही पद्धतीने होणे कठीण गेले असते. महाराष्ट्र आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये कायमचे वैमनस्य निर्माण झाले असते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन मराठी अस्मितेला हाक घालणारे होते खरे. मराठी माणसाने कायम स्मरणात ठेवावा असा तो न्याय्य संघर्ष होता, पण संयुक्त महाराष्ट्र समिती सत्तेवर आली असती तर काय झाले असते या नुसत्या कल्पनेने कित्येक महाराष्ट्राभिमानी लोकांच्या अंगावर काटा येतो. समितीच्या गुणसंपन्न नेत्यांना महाराष्ट्राच्या हृदयात अजूनही अत्यंत आदराचे स्थान आहे, पण एक एकजिनसी वैचारिक सुसंवाद असलेली, धोरणामध्ये सुसंगती असलेली शक्ती म्हणून समिती राज्य करू शकली असती काय, असा प्रश्न अजूनही विचारला जातो. प्रसिद्ध विचारवंत ह. रा. महाजनी यांच्यासारख्या पुष्कळ कट्टर महाराष्ट्रवाद्यांचे तर असे मत होते की चव्हाणांनी अत्यंत कौशल्याने आणि समजूतदारपणे महाराष्ट्राला व राष्ट्रीय काँग्रेसला शकले होण्यापासून व अराजकापासून वाचविले.
द्वैभाषिकाचे राज्य चालविताना चव्हाणांना अनेक आघाडय़ांवर शर्थीने लढावे लागत होते. एकीकडे शासनातील गुजराती लॉबी महाराष्ट्रातील विकास योजनांना पैसे पुरविण्याच्या बाबतीत चव्हाणांचे पाय ओढीत होती. दुसरीकडे गुजराती जनतेच्या भावना त्यांना सांभाळून घ्याव्या लागत होत्या. तिसऱ्या आघाडीवर संयुक्त महाराष्ट्र परिषद म्हणून भाषिक महाराष्ट्रासाठी जी संघटना निर्माण झाली होती- जीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस अग्रभागी होती- तिचा विरोध झेलावा लागत होता. शंकरराव देवांसारखा तगडा नेता महाराष्ट्र काँग्रेसचा सर्वेसर्वा होता. ते चव्हाणांना तोडूनमोडून फेकून देण्याची भाषा करीत होते. परिषद बरखास्त झाल्यावर तिची जागा समितीने घेतली, जीमध्ये डांगे, एसेम, अत्रे आघाडीवर होते. काँग्रेसमधील महाराष्ट्रवादी लोक पक्ष सोडून समितीत शिरू लागले होते. समितीने तर चव्हाणांना ‘महाराष्ट्रद्रोही, गद्दार, सूर्याजी पिसाळ’ अशा लाखोल्या वाहात त्यांच्याविरुद्ध एकच गदारोळ उठविला होता. तमाम मराठी जनताच जणू त्यांच्याविरुद्ध पेटून उठली होती. ठिकठिकाणी त्यांच्या सभा उधळल्या जात होत्या. अंडी, टोमॅटो, चपलांचा त्यांच्यावर वर्षांव होत होता. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ला. पण विदर्भ- मराठवाडा विभाग तसेच गुजरातमध्ये पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसचे सरकार येऊन यशवंतराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. या परिस्थितीत तोल ढळू न देता संयमाने विरोधकांना उत्तरे देणे आणि दुसरीकडे राज्यकारभारात ढिलाई येऊ न देणे अशी कसरत त्यांना करायची होती. कणखर विचार आणि आपल्या विचारांवर अविचल निष्ठा असल्याशिवाय असा वडवानल अंगावर घेणे शक्य नव्हते. याच काळात जयप्रकाश नारायण, के. एम. मुन्शी इत्यादिकांनी देशातील सर्वोत्तम मुख्यंमत्री म्हणून त्यांची प्रशंसा केली हे विशेष. पुढे महाराष्ट्र निर्मितीनंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे प्रसिद्ध संपादक फ्रँक मोराएस यांनीही एका लेखात भविष्य वर्तविले की नियतीने साथ दिली तर एक दिवस चव्हाण भारताचे प्रधानमंत्री होतील, असे गुण त्यांच्यात आहेत. पुष्कळांची अशी भविष्ये चुकीची ठरली.
आणखी एक आघाडी होती. हायकमांडचे मन जिंकून मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशा दोन प्रदेशांमध्ये द्वैभाषिकाचे विभाजन करणे कसे अटळ आहे हे केंद्रीय नेत्यांना पटवून देणे, चव्हाणांनी हे काम अत्यंत सुज्ञपणाने, चलाखीने आणि कसलाही गाजावाजा न करता केले. या विषयाच्या रोचक विस्तारात येथे जाता येणार नाही, कारण प्रस्तुत लेखाचा झोत चव्हाणांच्या एकूण राजकारणावर नसून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीवर आहे. चव्हाण विचाराने नेहरूवादी होते. स्वतंत्र भारताची एकी टिकण्यासाठी आणि देशातील लोकशाही व्यवस्थेच्या संवर्धनासाठी व्यापक व समाजहितैषु असा उदारमतवादी आधुनिक दृष्टिकोन असणारे नेहरू भारताच्या नेतृत्वपदी असणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. काँग्रेस पक्षाची भारतीय सर्वव्यापकता आणि गोरगरीबांसाठी सामाजिक व आर्थिक समता व न्याय प्रस्थापित करण्याची क्षमता यावर त्यांचा विश्वास होता. काँग्रेस हाच राष्ट्रीय चळवळीचा मुख्य प्रवाह आहे आणि त्या प्रवाहातच राष्ट्रीय पुनरुत्थानाची शक्ती आहे असा निष्कर्ष स्वतंत्रपणे कन्नमवार आणि नाईक यांना मुख्यमंत्रीपदावर आणण्यामागे चव्हाणांचा बहुआयामी धोरणात्मक दृष्टिकोन होता. उपरोल्लेखित सांगलीच्या भाषणात समस्यांचा ऊहापोह करताना त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचे वर्णन ‘भंगलेले मन’ असे केले होते. मराठा, ब्राह्मण, माळी, तेली, महार.. सर्व लोक आपापल्या जातीपुरता आणि जातींकरताच विचार करतात; मग समग्र समाजाचा विचार कोणी करायचा? ‘‘जातीयवादाच्या विषवल्लीपासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे, हा विचारच नष्ट केला पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्राचे मन एकजिनसी होईल..’’ असे त्यांचे म्हणणे. जातींमधील परस्पर संशय दूर करून असे एकजिनसीपण आल्याशिवाय खरी प्रगती होणार नाही हा त्याचा अर्थ. त्याला संदर्भ होता ‘हे राज्य मराठा राज्य असेल की मराठी राज्य’, या माडखोलकरांच्या सवालाचा. चव्हाणांनी बहुतेक समस्यांना तोंड देण्यासाठी सत्तेचा वापर केला आणि १९४६ नंतर त्यांच्या मनात हा विचार ठाम बसला. सामाजिक न्यायासाठी, आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सत्तेचा वापर करणे यात गैर काहीच नाही. उलट ते सकारात्मकच आहे. मात्र काही खोलवर रुजलेल्या व गुंतागुंतीच्या समस्यांना हाताळण्यासाठी सामाजिक आंदोलनच आवश्यक असते; (रस्त्यावरचे नव्हे.) परंतु १९४६ पासूनच सामाजिक आंदोलनामध्ये उतरण्यास त्यांना सवड नव्हती. शेवटपर्यंत सत्तेवर राहण्याचा त्यांचा ध्यास हा सत्तेच्या लोभाखातर नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक ध्येये साध्य करण्यासाठी होता. त्यांनी सत्तास्थानावरून स्वीकारलेली धोरणे त्यांच्या समाजवादी आकांक्षांना सुसंगत अशीच होती आणि त्यानुसार घेतलेले निर्णयही अनुरूप व परिणामकारी होते, पण परिणाम कितपत दीर्घकाळ टिकणारा होता याचे उत्तर देणे कठीण आहे. महत्त्वाकांक्षी मराठा नेत्यांना बाजूला सारून एकदम इतर मध्यम जातीतील नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसविणे ही गोष्ट क्रांतिकारक होती आणि त्या निर्णयाने चव्हाणांनी एका दगडात कितीतरी पक्षी पाडले. विदर्भाला दिलासा दिला, मराठेतर व ब्राह्मणेतर जातींना आशेचे किरण दिले, जातिभेदनिर्मूलनाचा जोरदार संदेश देऊन माडखोलकरांना परस्पर उत्तर दिले आणि मराठा नेतृत्वातील सरदार, दरकदार व जमीनदार लोकांना जरी तात्पुरते नाराज केले असले तरी सर्वसामान्य कुणबी-मराठा शेतकऱ्यांना इतर मार्गाने आपलेसे करून घेतले.
पण त्यामुळे हे ‘भंगलेले मन’ सांधले गेले काय? ज्यामुळे त्यांना दु:ख होत होते तो जाती-जातींमधील संशय दूर झाला नाही. चव्हाण मुख्यमंत्री होते तोवर आणि नंतर त्या प्रभावाने आणखी काही वर्षे परिस्थिती जैसे थे राहिली आणि नंतर विस्कटतच गेली. मराठा जातीयवाद उफाळून आला आणि इतरही जाती आपापल्या वेगळ्या चुली मांडू लागल्या. अर्थात याचा दोष एकटय़ा चव्हाणांवर येत नाही. काळ बदलला. मंडल कमिशनच्या औषधामुळे दुर्लक्षित जातींमध्ये आपल्या लोकशाही हक्कांबद्दल नवजागृती झाली, पण जाती-पातींच्या अस्मिता अधिकच कडव्या, असहिष्णू आणि आक्रमक झाल्या. मुख्यमंत्रीपदाचे वारसदार निवडताना मराठा उमेदवारांना त्यांनी डावलले खरे, पण त्यामध्ये त्यांचे तत्त्व होते आणि निष्ठाही होत्या, त्याचबरोबर चाणाक्षपणाही होता. दिल्लीत ते सत्तेवर असतानाच १९७२-७३ पासून महाराष्ट्रावरील त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. त्याच वेळी महाराष्ट्रातील मराठा लॉबी फणा काढून उफाळून आली. यामध्ये चव्हाणांची न्यूनता एवढीच की मुख्यमंत्री असताना आणि त्या पदावरून उतरल्यावरही त्यांनी आपल्या मागे सत्तेमध्ये मोक्याचा ठिकाणी जी माणसे पेरली त्यांच्यामध्ये चव्हाण ज्या तत्त्वांसाठी निष्ठापूर्वक संघर्ष करीत होते त्या तत्त्वांवर मन:पूर्वक निष्ठा असणारे फार कमी होते. चव्हाणांचे विविध क्षेत्रांमध्ये चांगले मित्र होते किंबहुना सारा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करीत होता, पण काही सन्मान्य अपवाद वगळता त्यांचे वैचारिक अनुयायी फार कमी होते. बहुतेक सारे सत्तेसाठी त्यांच्याबरोबर होते. नंतर अठरा-वीस वर्षांनी हातची सत्ता गेली तेव्हा फक्त त्यांचे काही मित्र सोबत उरले, पण सत्तेमध्ये निष्ठावान अनुयायी कोणी उरले नाही. राजकीयदृष्टय़ा भयाण एकाकीपणात त्यांचा शेवट झाला. सत्ता गेली तीसुद्धा तत्त्व, निष्ठा आणि काँग्रेसचा मुख्य प्रवाह याबाबतीत त्यांचा गोंधळ उडाल्याने आडाखे चुकले, निदाने चुकली त्यामुळे. असो. महाराष्ट्राच्या भावनिक व राजकीय ऐक्यासाठी तसेच भंगलेली मने सांधण्यासाठी आपल्या कारकीर्दीत सत्तेच्या माध्यमातून जे जे करायचे ते त्यांनी केले. ते दिल्लीला गेल्यावर मात्र काही वर्षांतच इकडे सगळे उलटे-पालटे झाले. या विपरीत इतिहासाचा दोष चव्हाणांवर टाकणे अन्यायाचे होईल. फार तर असे म्हणता येईल की, समाज मानसामध्ये बदल घडवून आणण्याची वैचारिक व नैतिक शक्ती असलेली कार्यकर्त्यांची व नेत्यांची जोरकस फळी त्यांना महाराष्ट्रात उभारता आली नाही. कोणी म्हणतील की एवढय़ा साऱ्या अपेक्षा चव्हाण महाराष्ट्रात नसताना त्यांच्याकडून करणे अनुचित होईल. राजकीय व सामाजिक दूरदृष्टी असलेले, विजिगीषू कर्तृत्वाचे व स्वयंभू बुद्धिमत्तेचे चव्हाण हे लोकोत्तर नेते असे आपण मानतो. महाराष्ट्राबाहेर असलेल्या विचारवंतांनीदेखील त्यांच्यातील हे गुण हेरून प्रधानमंत्री पदाचे आघाडीचे दावेदार म्हणून त्यांचा गौरव केला होता. त्यांच्याकडून अशा अपेक्षा करायच्या नाही, तर मग कोणाकडून?
मुख्यमंत्री म्हणून चव्हाण हे कुशल व प्रतिभावान प्रशासक होते. त्यांच्या वेळचे मराठी व अन्य राज्यातील कित्येक उच्च प्रशासकीय अधिकारी तसेच विरोधी पक्षातील नेते अजूनही त्यांच्या या भरीव कौशल्याबद्दल गहिवरून बोलतात. संरक्षण व गृहखात्याचे मंत्री असतानाही उत्तम प्रशासक म्हणून त्यांची प्रतिभा तळपत होती. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले कितीतरी मुरब्बी नेते त्या पदासाठी आसुसले असताना त्यांना बाजूला सारून नेहरूंनी कराडच्या या शेतकऱ्याच्या पोराला उचलून त्या पदावर नेले ते उगाचच नव्हे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची प्रशासकीय कीर्ती त्यांनी सर्वदूर पसरविली होती. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री असतानाच गुलामी स्वरूपाची महार वतनी पद्धती नष्ट करणारा कायदा त्यांनी १९५८ मध्ये मंजूर करून घेतला. घटनेद्वारे अस्पृश्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलती धर्मातर केलेल्या नवबौद्धांना उपलब्ध नव्हत्या. धर्म बदलला तरी त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती यत्किंचितही बदलली नव्हती. सामाजिक न्यायातील हे न्यून चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदावर येताच एका हुकुमाद्वारे दूर करून नवबौद्धांना या सर्व सवलती मिळवून दिल्या. दुसऱ्या कोणत्याही राज्याने हे पाऊल उचलले नव्हते.
शेती, उद्योग, अर्थव्यवस्था, सहकार, सिंचन, शिक्षण, साहित्य, भाषा व संस्कृती आदी समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रातील परिस्थितीचा आणि प्रश्नांचा चव्हाणांचा सखोल अभ्यास होता व त्यावर त्यांनी स्वत:च्या पुरोगामी विचारधारेतून चिंतन केले होते. त्याच दिशेने त्यांनी धोरणे आखली, निर्णय घेतले आणि गतीने अंमलबजावणी सुरू केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा योग्य तो मान ठेवून त्यांच्याशी मनमोकळी सल्लामसलत करणे व त्यांना बरोबर घेऊनच निर्णय करणे अशी त्यांची शैली होती. संपूर्ण प्रशासनामध्ये त्यांनी आपल्या या समजूतदार कार्यशैलीमुळे नवा जोम व चांगले काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण केली. राज्यातील प्रत्येक समाज समूहाला, प्रदेशाला, छोटय़ा दुर्लक्षित गटांना यथायोग्य न्याय मिळाला पाहिजे हे सूत्र त्यांनी प्रशासनामध्ये रुजविले आणि त्यानुसार कार्यपद्धती घालून दिली. त्यामुळेच त्यांच्या कल्याणकारी निर्णयांची प्रशासनाकडून त्वरेने अंमलबजावणी झाली. चव्हाणांनी आखलेली सर्वच धोरणे व त्यावर आधारित योजना व निर्णय यांचा ऊहापोह प्रस्तुत लेखात करता येणार नाही, पण काही विशिष्ट बाबींची नोंद करणे आवश्यक आहे. कृषी-औद्योगिक समाज हा शब्दप्रयोग भारताच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनाकारांनी केला. या संकल्पनेचा ठोस व यथायोग्य आविष्कार आपली धोरणे, योजना, निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांमधून चव्हाणांनी महाराष्ट्रात ज्या निष्ठेने केला तसा इतर राज्यांत क्वचितच झाला असेल.
आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गासाठी त्यांनी शिक्षणाचे दार उघडून दिले ते १९५७ साली मोफत शिक्षण योजना सुरू करून. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ९०० रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण खुले करून दिले. ९०० रुपयांची किंमत त्या काळातील परिस्थितीनुसार पाहायला हवी. पुढे ही मर्यादा पायरी पायरीने वाढविण्यात आली. बाळासाहेब खेरांच्या काळात इंग्रजी विषयाच्या शिक्षणाची माध्यमिक शाळांमध्ये सातवीपर्यंत हकालपट्टी झाली होती. चव्हाणांनी ऐच्छिक इंग्रजीची सुरुवात पाचवीपासून पुनश्च सुरू केली. शहरी व ग्रामीण भागातील फार मोठा विद्यार्थी वर्ग इंग्रजी भाषेपासून वंचित राहत असे व त्यामुळे तो नोकरीधंद्यांमध्ये मागे पडत असे. ही विसंगती दूर झाली. या दोन्ही निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. निजामीतून नुकतेच महाराष्ट्रात आलेल्या मराठवाडय़ात एकही विद्यापीठ नव्हते. महाविद्यालयेही खूपच कमी होती. नवे विद्यापीठ स्थापनेसाठी नियमानुसार विहित प्रदेशात कॉलेजेसची ठराविक संख्या असणे आवश्यक होते. चव्हाणांनी विशेष बाब म्हणून मराठवाडय़ासाठी हा नियम दूर करवून घेतला आणि २३ ऑगस्ट १९५८ रोजी स्वतंत्र विद्यापीठाचे औरंगाबाद येथे नेहरूंनी उद्घाटन केले. या विद्यापीठाने मराठवाडय़ाचा शैक्षणिक चेहरा-मोहरा बदलून टाकला. याच प्रकारे दक्षिण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विद्यापीठाची कोल्हापुरात स्थापना झाली आणि राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. आदिवासींसाठी आश्रम शाळा काढण्याचा निर्णयही चव्हाणांचाच.
आश्रम शाळांचा निर्णय क्रांतिकारक असला तरी पुढे या शाळांना राजकीय पुढाऱ्यांनी खाऊन टाकून या अभिनव योजनेचे मातेरे करून टाकले. आजही पुष्कळ ठिकाणी दुर्गम भागांत आश्रम शाळा सुरू आहेत. या शाळांच्या इमारतींसाठी, शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी साबण-खोबरेल तेलापासून तो जेवण (मांसाहारासह), गणवेष, अंथरुण-पांघरुण इत्यादी प्रत्येक सुविधेसाठी संपूर्ण अनुदान दिले जाते. पटावर विद्यार्थ्यांची संख्या असेल तेवढे अनुदान. आपल्या कल्पक राजकीय पुढाऱ्यांनी आणि बेरक्या व्यावसायिक समाजसेवकांनी स्थानिक प्रशासनाशी साटेलोटे करीत पटावरील संख्या अवाच्या सव्वा फुगविणे, गरीब आदिवासी मुलांसाठी योजलेला माल परस्पर लाटून त्यांना अर्धपोटी व अर्धनग्न ठेवणे, मुळातच नसलेल्या शाळांचे अस्तित्व भरपूर विद्यार्थी संख्येसह केवळ कागदावर दाखविणे इत्यादी सर्जक कल्पना लढवून या योजनेचे चराऊ कुरण करून टाकले आहे. काही प्रामाणिक संस्था मन:पूर्वक शाळा चालवीत आहेत, त्यांचा अपवाद केला पाहिजे. अनुदानित मोफत शिक्षणाचेही अनेकांनी असेच भजे करून टाकले आहे. बदलता काळ आणि बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानामुळे पार उलटी-सुलटी झालेली मूल्यव्यवस्था यांनाच दोष द्यायला हवा. मूळ योजना सोन्यासारखी.
चव्हाणांच्या काळात आरंभ झालेल्या सांस्कृतिक क्षेत्रातील कित्येक योजनांची एवढी नव्हे, पण थोडीफार अशीच अवस्था झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे चव्हाणांनी २१ डिसेंबर १९६० रोजी उद्घाटन केले तेव्हा केलेल्या भाषणातून त्यांची लोककेंद्री सांस्कृतिक दूरदृष्टी दिसून येते. हे मंडळ केवळ वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करणारे निव्वळ प्रकाशन खाते व्हावे एवढय़ापुरता त्यांचा उद्देश नव्हता.. मंडळ एक प्रकारचे पॉवर हाऊस बनावे, विद्युतगृह बनावे अशी माझी या मंडळासंबंधी अपेक्षा आहे. ते कुठेतरी क्षितिजापलीकडे राहणारी दुनिया बनता कामा नये. त्याने वाढती क्षितिजे निर्माण केली पाहिजेत. एवढेच नव्हे तर हे मंडळ, महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील बनविणारे माध्यम बनावे.. हे त्यांचे भाषणातील उद्गार. पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मे, १९६२ मध्ये याच मंडळाच्या अंतर्गत निर्माण केलेल्या विश्वकोष मंडळाने आजपर्यंत अभिमानास्पद कामगिरी केली आहे; परंतु ज्या सां. सं. मंडळाने पॉवर हाऊस बनून वाढती क्षितिजे निर्माण करायची होती त्याच्याकडे पुढे शासनाचे दुर्लक्ष झाले. आर्थिक व कल्पनाशक्तीचा खुराक कमी पडू लागला आणि अखेर चव्हाणांना जी भीती होती तसेच रूप मंडळाचे झाले.
मराठीला राज्यभाषा करण्यासाठी चव्हाणांनी भाषा संचालनालयाची निर्मिती केली. (डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस.) तत्कालीन मोठे भाषातज्ज्ञ या मंडळावर होते. संचालनालयाने उत्कृष्ट काम करून मराठीचा वापर बहुतेक क्षेत्रांत करण्यासाठी अव्वल दर्जाची पुस्तके काढली. राज्य व्यवहार परिभाषा कोशाची काही दिग्गज मराठी लेखकांनी टिंगल-टवाळी केली, पण मराठी सारस्वताकडून एवढा दुस्वास होऊनही त्या कोषातील कित्येक शब्द शासकीय व्यवहारात आणि खेडय़ापाडय़ातील लोकांच्या संवादांमध्ये शिरलेच. आजही त्यांचा वापर होतो. आज हे संचालनालय कोठे गहाळ झाले कोणास ठाऊक? साहित्य, संस्कृती, भाषा यांच्यासाठी नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी काही संस्था काढूनही मराठी भाषेकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड अद्यापी कमी झालेली नाही. कलाप्रेमी चव्हाणांनी नाटक, मराठी चित्रपट क्षेत्रांना उभारी देण्यासाठी ज्या योजना केल्या त्यासाठी कलाकार मंडळी अजूनही त्यांना नावाजत असतात. त्यांच्यानंतरचे सत्ताधारी भाषा व संस्कृतीसंबंधी थोडे उदासीन तरी राहिले किंवा त्यांच्यात राजकीय इच्छाशक्ती उरली नसावी.
चव्हाणांनी राज्यभर औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची र्सवकष योजना स्वीकारली, ज्यायोगे शहरांपासून दूर ग्रामीण भागातदेखील छोटे कारखाने निघून तेथील रोजगार वाढेल. मूळ कल्पना नेहरूंनी १९४७ साली स्थापन केलेल्या अ‍ॅडव्हायसरी प्लॅनिंग बोर्डाची. याच बोर्डाने १९५५ साली औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची प्रांतांना शिफारस केली. मुख्यमंत्री चव्हाणांचे द्वैभाषिक ही योजना राबविण्यात आघाडीवर होते. महाराष्ट्र राज्य झाल्यावर चव्हाणांनी योजनेत सुधारणा करून तिचा वेगाने विस्तार केला. निमसरकारी तसेच बिगर सरकारी संस्था व खासगी उद्योगांनी अशा वसाहती स्थापण्याकरिता त्यांना उत्तेजन दिले व तसे नियम केले. त्या काळात योजना इतर राज्यांपेक्षा बऱ्यापैकी सक्षमपणे इथे राबविली गेली. मुंबईजवळ ठाणे, पुण्याच्या आसपास आणि कोल्हापूरजवळ शासकीय प्रयत्नाने अशा वसाहती निर्मिल्या गेल्या व त्यांना योजनेप्रमाणे पुष्कळ सोयी-सवलती मिळाल्या. पुढे औरंगाबाद येथील वसाहतीनेदेखील जोर धरला, पण अपेक्षेप्रमाणे, मोठी शहरे सोडून दूरच्या भागांत ज्या वसाहती निर्माण केल्या गेल्या त्या बहुतेक ओस पडल्या. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या त्रिकोणात चांगले औद्योगिकीकरण झाले. औरंगाबाद आणि कोल्हापूर वगळता बाकीचा भाग अजूनही औद्योगिक दृष्टीने मागासलेलाच राहिला हे सरकारी अहवालांवरून कळते. त्यामुळे हा त्रिकोण सोडता उर्वरित महाराष्ट्र विकासाच्या व दारिद्रय़ाच्या मापदंडांमध्ये बिहार-ओरिसाच्याच बरोबरीने राहावा अशी विषण्ण परिस्थिती काल-परवापर्यंत होती. आता उदारीकरणानंतर थोडाफार फरक पडला असण्याची शक्यता आहे. पुण्याजवळ भोसरी येथे औद्योगिक वसाहत उभारायची होती तेव्हा चव्हाणांनी स्वत: जाऊन वसाहतीसाठी जागा निवडली. तेवढी तळमळ त्यांच्या नंतरच्या नेत्यांमध्ये अभावानेच असावी. त्यांना तेवढा वेळही नसावा.
मुंबई-पुण्यातील उद्योग भराभरा वाढू लागले ते १९६० नंतर. त्याला कारण चव्हाणांचे उमदे व्यक्तिमत्त्व आणि कामगारांप्रमाणेच उद्योजक, गुंतवणूकदार इत्यादिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा उमदा, मनमिळावू स्वभाव. द्वैभाषिकाचे ते १९५६ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा धनाढय़ उद्योजक, गुंतवणूकदार, व्यापारी वगैरेंच्या पंचतारांकित वर्तुळात ते अपरिचित होते व त्या समूहांमध्ये हा ‘घाटी’ खेडेगावचा शेतकरी माणूस कसा वावरू शकेल याबद्दल अनेकांना शंका होत्या, पण विचारांचा पक्केपणा, आपल्या तत्त्वांवरील विश्वास आणि हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द या जोरावर ते या वर्तुळांमध्ये सहजतेने व आत्मविश्वासाने वावरत. राजकीय जाण आणि उत्तम वाचन यामुळे अशा गटांमधील संभाषणात ते सहज भाग घेऊन आपल्या वाक्चातुर्याने लोकांना चकित करून टाकीत. बिर्ला, टाटा, महेंद्र, बजाज आदी उद्योगपतींचा चव्हाणांच्या क्षमतेवर विश्वास बसला. पुण्याचा ऑटोमोबाईल उद्योग वाढला, मुंबई-ठाण्यात विविध कारखाने येऊ लागले.
याचा अर्थ चव्हाण भांडवलदारांना धार्जिणे होते आणि त्यांचे लांगुलचालन करीत होते, असा मुळीच नाही. राम प्रधान यांना चव्हाणांनीच सांगितलेला एक किस्सा येथे दिला पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यावर चव्हाणांनी आपले बिऱ्हाड सह्याद्रीमध्ये हलविले. त्या दिवशी सगळी कामे आटोपून उशिरा झोपी गेले. हे नेहमीचेच होते. पहाटे सहा वाजता शिपायाने उठविले. बाहेर घनश्यामदास बिर्ला आलेत म्हणून. चव्हाण कसेबसे आवरून बैठकीच्या खोलीत आले. शुभ्र झब्बा-पायजाम्यात बिर्ला होते. चव्हाणांनी स्वागत केले, बिर्लाशेठनी अभिनंदन केले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत, थोडा वडिलकीचा सल्ला देऊन बिर्ला निघून गेले. दोन-तीन दिवस असेच झाले. रोज सकाळी येऊन ते चव्हाणांना उठवीत. चौथ्या दिवशी मात्र चव्हाणांनी सांगितले की, माफ करा, मी जरा उशिराच झोपतो. आपले काही काम असेल तर कचेरीत येऊन केव्हाही भेटावे. बिर्लानीही खेळकरपणे माफी मागितली. ते म्हणाले की, ते सकाळी फिरायला जात आणि परतताना सहज मोरारजीभाईंशी गप्पा मारायला सह्याद्रीवर येत. ‘काम असेल तर जरूर कचेरीत भेटेन’. एवढी गोष्ट चव्हाणांचे चारित्र्य सांगायला पुरेशी आहे. शेवटपर्यंत त्यांना पैशांची चणचण असायची. शेवटच्या काळात त्यांनी कऱ्हाडला ‘विरंगुळा’ नावाची छोटीशी बंगली बांधली. इतका दीर्घ काळ सत्तेच्या उच्चस्थानी असूनही ती बंगली मंत्र्याच्या काय पण साध्या आमदाराच्याही इतमामाला मुळीच शोभेशी नाही.
ग्रामीण भागात शेतीमधील उत्पादित मालाच्या प्रक्रियेवर आधारित कारखाने काढून कृषी औद्योगिक असा पुरोगामी समाज निर्माण करण्याची आकांक्षा त्यांनी महाराष्ट्राला सांगितली. ते मुख्यमंत्री झाले तोवर विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याने चांगली प्रगती करून भोवतालच्या दुष्काळी ग्रामीण भागाचा कायापालट केला होता. आणखी चार सहकारी कारखाने निघाले होते. विखे-पाटलांनी तर शेतीला लागणारी अवजारे आणि साखर कारखान्याला लागणारी अवजड मशिनरी तयार करण्याचा मोठा कारखाना काढण्याचा चंग बांधून त्यासाठी वेगळी सहकारी सोसायटी निर्माण केली होती. चव्हाणांनी कृषी-उद्योग क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्र नवनिर्माणाचे काम करू शकते ही क्षमता ओळखली आणि त्या क्षेत्राला उचलून धरले. सहकारी कायद्यांमध्ये विविध सुधारणा करून त्यांना केंद्राकडून मंजुरीही मिळविली. सहकारी संस्था स्थापन करण्याच्या प्रक्रिया त्यामुळे सुलभ व लवचिक झाल्या. समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत सहकार क्षेत्राचा विस्तार होऊन पश्चिम महाराष्ट्रात हरित क्रांती घडून आली. सहकार म्हणजे केवळ साखर कारखाने नव्हे. गावपातळीवर बी-बियाणे आणि शेतीसाठी कर्ज पुरविणाऱ्या सहकारी सोसायटय़ांपासून तो पशुपालन, दूध-दुभते, शेतमालाची खरेदी-विक्री, सिंचन, राज्यपातळीपासून तो गावापर्यंत बांधलेल्या सहकारी बँकांच्या साखळ्या आणि शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने या सर्व गोष्टी सुलभतेने होण्यास त्यांनी झटून प्रयत्न केले. राज्यातील सहकार, उद्योग व सिंचन खाते, तसेच केंद्रातील उद्योग खाते या सगळ्यांची मेळवणी करून अनेक नवे कायदे केले आणि जुन्या कायद्यांमध्ये सर्वात खालच्या स्तरापर्यंत सहकाराचे फायदे पोहोचतील अशा सुधारणा केल्या. नव्या साखर कारखान्यांची परवानगी फक्त सहकारी संस्थांनाच मिळेल असे नियम केंद्राची मनधरणी करून करवून घेतले. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी कार्यकर्त्यांचे घट्ट जाळे विणले गेले, ग्रामीण भागात समृद्धी आली, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारले. शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविलेल्या कारखान्यांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा कायापालट करून टाकला. शैक्षणिक संस्था उभारल्या. राजकीय व सामाजिक जागृती वाढली. शेतकऱ्यांना प्रगतीचे दार खुले झाले.
शेतकऱ्यांना दिलासा देणारे सर्वच निर्णय व योजना विस्तारभयास्तव देता येणार नाहीत, पण कुळकायद्याची पद्धतशीर अंमलबजावणी आणि शेत-जमिनीच्या कमाल धारणेवर मर्यादा घालण्याचा कायदा (लँड सीलिंग अ‍ॅक्ट) यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. साऱ्या देशात सर्वप्रथम म्हणजे १९६१ साली हा कायदा करून महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा चव्हाणांनी उजळून टाकली. केंद्र सरकारने एका दशकानंतर असा कायदा केला. पाटबंधारे व सिंचनाच्या प्रश्नाची तड लावण्यासाठी महाराष्ट्राची सिंचन क्षमता तपासून ती कशा प्रकारे वाढविता येईल यासाठी विद्वानांचे अभ्यासगट नेमले. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. हे पंचायत राज्य विधेयक विधिमंडळाने ८ डिसेंबर १९६१ रोजी पारित केले आणि योजना प्रत्यक्ष १ मे १९६२ पासून अमलात आली. खरे म्हणजे या बाबतीत महाराष्ट्र राज्य जरा मागेच होते, पण त्याचे कारण या कायद्यातील तरतुदी पूर्ण विचारांती काळजीपूर्वक केल्या होत्या आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील हा प्रयोग सवरेत्कृष्ट व दीर्घकाळ टिकणारा ठरला. स्वत: नेहरूंचा सत्तेचे लोकशाही पद्धतीने विकेंद्रीकरण करून पंचायत राज्य निर्मितीवर कटाक्ष होता. त्यानुसार बलवंतराय मेहता कमिटी शिफारसी करण्यास नेमली गेली. नेहरूंच्या आग्रहाने पुष्कळ राज्यांनी अहवाल लगेच स्वीकारून तो अमलात आणला. चव्हाणांना मात्र त्यात अनेक त्रुटी जाणवल्या. पंचायत राज्याबद्दल त्यांचेही काही ठोस विचार होते. अहवालाचा सांगोपांग अभ्यास करून सूचना करण्यासाठी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. आठ महिन्यांनी कमिटीचा अहवाल आल्यानंतरच विधेयक तयार करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. विधेयकातील काही तरतुदींवर केंद्रातील काही लोक आणि राज्यातील आमदार, खासदार नेतेमंडळी नाराज होती, कारण त्यांना जिल्हा परिषदांच्या कामात हस्तक्षेप करायला वाव ठेवण्यात आला नव्हता. चव्हाणांनी मात्र मोठय़ा चातुर्याने विधेयक संमत करून घेतले. १२ एप्रिल १९६१ रोजी नाईक समिती अहवाल जेव्हा विचारासाठी विधानमंडळात आला त्या वेळी चव्हाणांनी केलेले भाषण त्यांच्या विचारपूर्ण संसदीय वक्तृत्वाचा एक नमुना तर आहेच, पण त्याचप्रमाणे लोकशाहीतील प्रशासनाच्या प्रक्रिया, निर्वाचित सत्ताधाऱ्यांचे अधिकार आणि पंचायत राज्याच्या संकल्पनेचा लोकशाहीच्या चौकटीत बसणारा भावार्थ या गोष्टींबद्दलचा त्यांचा अभ्यास आणि गाढ समज या भाषणातून प्रतीत होते. खासदार व आमदारांना जिल्हा परिषदांवर कोणतेही स्थान असू नये हा विधेयकातील वादाचा मुद्दाही मंजूर झाला.
चव्हाणांच्या कारकीर्दीतील इतर निर्णय व योजनांवर विस्ताराने लिहिण्याऐवजी सहकार आणि पंचायत राज्य या दोन गोष्टींचा महाराष्ट्रातील प्रवास विचारात घ्यायचा आहे. सहकार चळवळीचे किंवा सहकारी साखर कारखान्यांच्या चळवळींचे श्रेय चव्हाणांना देण्याचा प्रश्न नाही. ते द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सहकारी चळवळ अस्तित्वात होतीच. जिल्ह्या-जिल्ह्यात सहकारी बँका होत्या. गावांमध्ये क्रेडिट सोसायटय़ा होत्या. साखर उत्पादन करणारे सरकारी कारखानेही होते. पंचायत राज्यांची सूचना केंद्राकडून आली होती. चव्हाणांचे नाव घेतले जाते ते ज्या कार्यक्षमतेने, कल्पकतेने आणि विचारांनी त्यांनी पंचायत राज्याची कल्पना राबविली तसेच सहकाराचे मर्म समजून ज्या तडफेने ती चळवळ वाढविली आणि तिचा लोकहितासाठी उपयोग करून घेतला, त्यासाठी. सहकारी साखर कारखान्याच्या चळवळीने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा कसा बदलून टाकला ते वर उल्लेखिले आहेच. विदर्भासारख्या ज्या विभागात ही चळवळ नीट मूळ धरू शकली नाही तेथील शेतकऱ्यांची अवस्था आज कशी झाली हे सांगायला नको. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमुळे लोकशाही प्रक्रियेच्या जणू पाठशाळा महाराष्ट्रात निर्माण झाल्या. दोन्ही क्षेत्रांमधून एकमेकांस पूरक अशा जागृत कार्यकर्त्यांचे मोहोळच राज्यात तयार झाले. क्रेडिट सोसायटय़ा, जिल्हा सहकारी बँका, दूध सोसायटय़ा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा तसेच सहकारी साखर कारखाने यांमधून संसदीय, प्रशासकीय कार्याचा तसेच आर्थिक उलाढालींचा समृद्ध अनुभव घेतलेले कार्यकर्ते विधिमंडळात व मंत्रिमंडळात येऊ लागले त्यामुळे तेथील कामकाजाचा दर्जा सुधारला. याचीच दुसरी बाजू अशी की ग्रामीण राजकीय कार्यकर्त्यांसाठी राज्यातील व केंद्रातील सत्तास्थानी पोहोचण्याचा हा राजमार्गच तयार झाला. याचा सगळ्यात जास्त फायदा काँग्रेस पक्षाला होणे स्वाभाविक होते. चव्हाणांनी राज्यातील काँग्रेस पक्ष खालपासून वपर्यंत असा अभेद्य पाषाणासारखा बांधला असे म्हटले जाते ते या कारणाने. पक्ष बांधण्यासाठी म्हणून चव्हाणांनी या चळवळींना वाढविले असे म्हणता येणार नाही. तो एक अवांतर फायदा होता.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. ग्रामीण कार्यकर्त्यांची फळी राज्यात सत्तास्थानी येऊ लागली. याचा अर्थ ग्रामीण बहुजन समाज जो सत्तेपासून शेकडो वर्षे दूर होता तो सत्तेत आला. हा बहुजन समाज म्हणजे मराठा समाज. शेतकऱ्यांना पूर्वी कुणबी असे संबोधिले जात होते. पुढे ते कुणबी-मराठा झाले. १९३२ च्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकींपासून उच्चवर्णीय धनाढय़ मराठा जमीनदारांनी जनगणनेत शेतकऱ्यांना आपली जात मराठा म्हणून नोंदवायला प्रोत्साहित करून लोकशाही निवडणुकांतील गठ्ठा संख्या-सामर्थ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. सं.म. चळवळीच्या टीपेच्या काळात झालेली १९५७ ची सर्वसाधारण निवडणूक आणि महाराष्ट्र झाल्यानंतरही १९६२ ची निवडणूक यात निवडून आलेल्या आमदार-खासदारांची समाजशास्त्रीय छाननी केली तर असेंब्लीचा सामाजिक कायापालट झालेला दिसून येईल. हे सारे चव्हाणांनी हेतूपूर्वक घडवून आणले असे म्हणणे त्यांना सुपर-सुपरमॅन समजणे होईल. ती एक लोकशाही प्रक्रिया होती हेच खरे. दुर्लक्षित समाज सत्तास्थानी आला म्हणून चव्हाणांना बरे वाटले असेल यात शंका नाही, पण या प्रक्रियेतही एक श्लेष आहे. शोषक आणि शोषित यातील फरक चव्हाण जाणून होते. लहानपणी शाळेतील फीमाफीसाठी लागणारे नादारीचे शिफारसपत्र अशाच एका ‘सजातीय’ धनाडय़ाने त्यांना नाकारून ‘तुला रे कशाला शिकायचे? त्यापेक्षा माझी गुरे चरायला नेत जा. पैसे तरी मिळतील’, असा सल्ला दिला होता. सहकार आणि पंचायत राज्य या दोन्ही संस्थांमधून वपर्यंत आलेले नेतृत्व सारेच शोषितांमधून आले होते असे म्हणता येणार नाही. थोडय़ाच काळात हे स्पष्ट झाले. चव्हाण दिल्लीला गेल्यानंतर हळूहळू मराठा लॉबीने जमवाजमव करायला सुरुवात केली. कारखाना मराठय़ांचा, माळ्यांचा, धनगरांचा, अमुक जातीचा असे शिक्के बसू लागले. जाती-पातींमधील संशय व दुरावा नष्ट करण्याच्या चव्हाणांच्या स्वप्नांचा असा चुराडा उडाला.
सहकारी कारखानदारीतून निर्माण होणारी अतिरिक्त संपत्ती सारी सदस्यांनीच खाऊन न टाकता तो पैसा ग्रामीण विकासासाठी आणि शिक्षणासाठी वापरायचा असा सुरुवातीच्या सहकारी नेत्यांचा-विखे पाटील, तात्यासाहेब कोरे, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, भाऊसाहेब थोरात, शंकरराव मोहिते-पाटील इत्यादीचा बाणा होता त्यामुळेच ग्रामीण परिसराची परिस्थिती सुधारली. बाहेर राजकारण करा. पण सहकारी कारखान्यात राजकारण आणू नका, असे विठ्ठलराव विखे पाटील तळमळीने सांगत होते. पण एवढा पैसा, एवढी यंत्रणा हाताशी, कार्यकर्त्यांचा चमू, हे सारे असताना, सहकारी कारखान्यात राजकारण शिरणे अपरिहार्य होते. पुढे तर राजकारण करायचे आहे, सत्तेत दाब निर्माण करायचा आहे या हेतूनेच कारखाने काढले जाऊ लागले. पैशांचे तर्कशास्त्र कोणी थोपवू शकत नाही. महाराष्ट्रातील सुमारे दोनशे कारखान्यापैकी अध्र्याच्या वर कारखाने आता संकटात सापडले आणि ही लागण झाल्याने सारी चळवळच बदनाम झाली. साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये कोटय़वधी रुपये खर्च होऊ लागले. वरची सत्ता मिळविण्यासाठी जिल्हा परिषदा, साखर कारखाने ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न होऊ लागले. पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, क्रेडिट सोसायटय़ा, जिल्हा सहकारी बँका, साखर कारखाने, दूध सोसायटय़ा आणि त्याचबरोबरीने विधिमंडळ, लोकसभा यांच्या लागोपाठ येणाऱ्या निवडणुकांची एकच धमाल गाव-गावांमध्ये उडू लागली. पैशाचा पाऊस पडू लागला. निवडणुकांत काम करणारे तरुण व्यावसायिक कार्यकर्ते काही काम न करता इकडेतिकडे बेकारांसारखे उंडारू लागले. विकास कामांवरून लक्ष उडाले. सतत निवडणुकांच्या नशेत राहिल्याने गावच्या सकारात्मक पारंपरिक मूल्यांना मरगळ आली. खेडी बकाल होऊ लागली. या सर्व विपरीत प्रवाहाचा कोणा एकाला दोष देता येणार नाही.
नवा समाज निर्माण करण्यासाठी चव्हाणांनी सत्ता हे माध्यम मानले आणि ते सत्तेतच रमले. जोडीला मूल्यांवर व विचारांवर कणखर श्रद्धा असलेला ताठ कण्याचा समूह हवा याचे भान कदाचित त्यांना राहिले नसावे. सत्तेची मात्रा पुष्कळ ठिकाणी परिणामकारक असते. खूप सकारात्मक व रचनात्मक गोष्टी घडविल्या जाऊ शकतात. मात्र सत्तेवर उतारा म्हणून जोडीला सामाजिक, नैतिक चळवळी नसल्यास पुढे या औषधामुळे गुंतागुंत होऊ शकते. साईड इफेक्टस निर्माण होतात. बऱ्याच महान नेत्यांचे कर्तृत्व तपासून पाहिले तर त्यांचीही अशीच शोकांतिका झालेली दिसते, पण त्यामुळे त्यांची महत्ता कमी होत नाही.

जन्म : १२ मार्च १९१३ (देवराष्ट्रे, खानापूर, सांगली)
मृत्यू : २५ नोव्हेंबर १९८४
भूषविलेली अन्य पदे
* १९५६ ते १९६० (द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रीपद)
द्विभाषिक राज्याच्या मंत्रिमंडळात नागरी पुरवठा व समाज कल्याण ही खाती.
* उपपंतप्रधान, केंद्रात संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र खात्यांचे मंत्री, ’ लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
पक्ष: काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये कराड मतदारसंघ

अरूण साधू,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

Monday, November 29, 2010

घाबरू नका मीडियातील डॉली बिंद्राला!

स्पेक्ट्रम घोटाळ्यात एकमेकांवर नावे घेऊन चिखलफेक करण्यासाठी राजकारणी धावत आहेत. पण कोणीही पत्रकार किंवा वृत्तपत्रांच्या संस्थांची नावे घ्यायला तयार नाहीत. एक तर त्यांना त्यांचंच बरंच काही दडवायचं आहे. आणि मीडियावर हल्ला चढवणं कदाचित त्यांच्यावर उलटू शकतं. पण त्यापेक्षाही आणखी चिंतेची बाब आहे ती ही की मीडियातील भ्रष्ट व्यक्ती या बिग बॉसच्या चौथ्या सत्रातील डॉली बिंद्रासारख्या आहेत. तिच्यातील चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो आहे. पण तिच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हे ठरवायला तुम्हाला आणखी काही काळ विचार करायला लागतो आहे.
हे काही मीडियाचे समर्थन नाही. उलट हा लेख वाचताना तुम्हाला जाणवेल की त्याच्या विरोधातच आहे. सर्वात प्रथम मीडियाच्या संदर्भातील काही आरोप आणि प्रत्यारोप मला तुमच्यापुढे मांडू द्या. मीडिया किंग मेकर आहे. तोच एक भ्रष्टाचार आहे. समाजातील वास्तववादी परिणामापासून ते फार वेगळे आहे. आणि ते सनसनाटी निर्माण करणारे आहे. काही प्रमाणात हा मीडियावर त्यांनीच ओढवून घेतलेला आरोप आहे तर काही प्रमाणात हे वास्तव आहे. सर्वात प्रथम मीडिया हा भ्रष्ट आहे. त्याचे संबंध फार उच्च स्तरापर्यंत पोहोचले आहेत.
मीडियातील प्रत्यक्ष कामकाजाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे आणि ते जाणू शकतात. कोणत्याही वृत्तपत्राच्या संस्थेमध्ये बाहेरच्या जगाला माहीत असलेल्या ‘शक्तिशाली’ संपादकीय विभागात साधारणपणे पन्नास एक लोक काम करतात, ज्यातील निम्म्यापेक्षा फार कमी जण वार्ताहर असतात (खऱ्या अर्थाने श्रमिक पत्रकार) ज्यांचा बाहेरच्या जगाशी अधिक संपर्क असतो किंवा बाहेरच्या जगाला त्याबद्दल माहिती असते. त्या २० पत्रकारांपैकी फारतर चार किंवा पाच जण असे पत्रकार असतात, ज्यांचा उच्च स्तरापर्यंत किंवा खूप वपर्यंत संपर्क असतो. म्हणजे त्यांचा राजकारणातील प्रमुख लोकांपर्यंत (राजकीय बीट सांभाळणारे) आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत (जे बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमा-अन्य भाषिक सिनेमा नाही-हे बीट सांभाळतात) यांच्याबाबत मी सांगत आहे. क्रीडा विभाग हा दुय्यम असतो आणि त्यातही केवळ क्रिकेट आणि त्यातही सचिन तेंडुलकरशिवाय अन्य काही नाही, हेच पत्रकार असे असते.
आता आपण संपादकीय विभागातील पन्नासपैकी केवळ पाच जणांबाबत बोलत आहोत, जे राजाच्या खांद्याला खांदा घासत असतात. ते १० टक्क्यांपेक्षा कमी आहेत. आणि त्यातही एखाद्या दुर्मिळ प्रसंगी एखादा पत्रकार आपल्या पदाचा गैरवापर करतो.
हे सर्व तो पत्रकार कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित आहे, यावर अवलंबून असते. सत्तेच्या वर्तुळात ते वृत्तपत्र किती महत्त्वाचे आहे आणि तो पत्रकार तेथे कोणत्या पदावर आहे, यावरच सर्व अवलंबून असते. शेवटी अन्य वृत्तपत्रातील त्याचे प्रतिस्पर्धी सहकारी आणि त्याच बीटवर काम करणाऱ्या त्याच्या अन्य सहकाऱ्यांपेक्षा तो किती योग्य प्रकारे आपला निशाणा साधतो, हेच मुख्य पाहण्यासारखे आहे. म्हणजेच एकूण कामाच्या केवळ एक टक्का हा कदाचित भ्रष्ट असू शकतो. मग संपूर्ण मीडिया भ्रष्ट असल्याचा सामूहिक आरोप आला कुठून? हे सुरू झाले ते मीडियाने त्याच्या संबंधांचा गैरवापर करून शिधापत्रिका प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आणि प्रेस चे स्टिकर वापरून वाहतूक यंत्रणेतून झटपट स्वत:ची सोडवणूक करून घेतली तेव्हापासून. पण हा लेख तुम्हाला चित्रपटाची तिकीटे मिळवून देणाऱ्या किंवा मंत्र्याबरोबर तुमची भेट ठरवून देणाऱ्या ९५ टक्के पत्रकारांबाबत नाही. तर उरलेल्या पाच टक्के पत्रकारांबाबत आहे.वर्षांनुवर्षे आपण काम करतो त्या वृत्तपत्रापेक्षा स्वत:ला मोठे समजणारे हे पाच टक्के मंडळी आहेत. त्यांना असे वाटते की उच्चपदस्थ किंवा फार मोठय़ा पदावरच्या व्यक्ती आपल्याकडे तोंडावर ओशाळवाणे हसू घेऊन येतात ते आपल्या वृत्तपत्रामुळे किंवा आपल्या पदामुळे नाहीत तर आपल्यामुळेच आपल्याकडे येतात. आपल्याला कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी त्यांच्या घरी बोलावतात किंवा गणपतीमध्ये पत्रकाराच्या घरी जातात, ते केवळ आपल्यामुळेच! एखाद्या राजाने एखाद्याच्या घरी सणावाराला भेट दिली किंवा त्याच्या पहिल्या नावाने हाक मारली तर कोणाला आपण किंगमेकर झाल्यासारखे वाटणार नाही?वास्तवता लक्षात न घेता, तुम्हाला राजासोबत पाहिल्यावर तुमच्या समाजातील किंवा तुमच्या शेजाऱ्यांपैकी किमान अध्र्या लोकांना तुम्ही शक्तिशाली असल्याचे वाटेल आणि अध्र्या लोकांना तुम्ही भ्रष्ट असल्याचे जाणवेल.
खरं तर तुम्ही एका अत्यंत मोठय़ा भ्रमात असलेले गाढव आहात, जे असे समजतात की राजा (राजकारणी, चित्रपट अभिनेते किंवा गुन्हेगारी जगतातील सम्राट) हा तुमच्या लेखणी किंवा तुमच्या पदाला घाबरत नसून तो तुम्हाला घाबरतो. जशी डोक्यावरील केस, तोंडातील दात आणि हाताची नखे जोपर्यंत त्याच्या जागी असतात तोपर्यंतच त्याला किंमत असते; तशीच पत्रकाराची किंमत (ते कितीही चांगले बोलत असले तरी) तोपर्यंतच असते हे ते जाणत नाहीत. जेव्हा ती संपते तेव्हा तर अधिक नसते.
एक काळ असा होता की, जेव्हा पत्रकार त्याच्या प्रभावी लेखणीने ओळखला जायचा. ते जे लिहित त्याला ताकद होती. वास्तवावर आणि निर्भिडपणे त्यांचे लिखाण होते. खऱ्या सत्तेला त्याबाबत संपूर्ण आदर होता. आज सत्ता भ्रष्ट झाली आहे. संपूर्ण सत्ता (मी स्वत: किंग मेकर असल्याचे मानतो)ही पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. कदाचित खोटे वाटेल पण संपूर्णपणे भ्रष्ट असलेला पत्रकार हा शक्तिशाली झाला आहे, तो त्याच्या लेखनामुळे नाही तर तो कोणाबरोबर आहे त्यामुळे. तो जो लेख लिहितो त्याच्याबदल्यात त्याला काही तरी मिळते, अनेकदा पैसे तर काहीवेळा वस्तुच्या रुपात त्याला त्याची किंमत मिळत असते. यामुळे ही मंडळी खंडणीखोर किंवा अपहरणकर्त्यांपेक्षा वेगळी नाहीत. तुमचे प्रेम एकीकडे मिळवत असताना त्याची किंमत ते अपेक्षित करीत असतात. मग जेव्हा तुम्हीच त्यात अडकले आहात तेव्हा मीडियाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना तुम्ही कसे अडवू शकणार? स्पेक्ट्रम घोटाळ्यात एकमेकांवर नावे घेऊन चिखलफेक करण्यासाठी राजकारणी धावत आहेत. पण कोणीही पत्रकार किंवा वृत्तपत्रांच्या संस्थांची नावे घ्यायला तयार नाहीत. एक तर त्यांना त्यांचंच बरच काही दडवायचं आहे. आणि मीडियावर हल्ला चढवण कदाचित त्यांच्यावर उलटू शकते. पण त्यापेक्षाही आणखी चिंतेची बाब आहे ती ही की मीडियातील भ्रष्ट व्यक्ती या बिग बॉसच्या चौथ्या सत्रातील डॉली बिंद्रासारख्या आहेत. तिच्यातील चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो आहे. पण तिच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हे ठरवायला तुम्हाला आणखी काही काळ विचार करायला लागतो आहे. त्यामुळे तुमच्यापैकी काहीजण तिच्या वागण्याचा निषेध करतील आणि तिच्याबद्दल कडवट होतील तर त्या घरातील बाकी सगळ्यापुढे एकच उपाय असेल म्हणजे तिच्यापासून हातभर अंतर राखून वागणे. मीडियातील डॉली बिंद्रापासून हात राखून वागणे हेच सगळ्यात उत्तम. मी जितक्या जवळ जातो आहे तितके मी त्यांच्या अधिक प्रेमात पडण्याची, त्यांच्या समर्थनात जाण्याची शक्यता आहे. पण गप्प राहणे हा बाकी काही उपाय नाही. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गप्प बसून गुन्हा पाहणे हा देखील मोठा गुन्हा आहे. म्हणून सभ्यतेच्या बुरख्याआड राहून जे भ्रष्ट आहेत असे तुम्हाला वाटते त्यांच्या विरोधात आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. बाकीच्यांसाठी नागरी पत्रकारिता किंवा सामाजिक मीडिया हा पर्याय आहे. अन्यथा तुम्ही किंवा माझ्यासारखे सर्वसामान्य, जे आदर्श घोटाळा किंवा कॉमनवेल्थ किंवा तत्सम घोटाळ्यात आवाज उठवू शकलो काय?


शिशिर जोशी
(लोकसत्ता)
रविवार, २८ नोव्हेंबर २०१०
अनुवाद - प्रसाद मोकाशी)

एडिटर-ऑडिटर जिंदाबाद

पत्रकारितेतून मिळणारी प्रसिद्धी आणि माहिती जनहितासाठी कशी वापरली जात नाही, याची चुणूक राडिया-बरखा-संघवी प्रकरणाने दाखविली आहे. तालुका पातळीवरील पत्रकार पोटासाठी अशी ‘जोडकामे’ आणि ‘संदेशवहना’चे काम करतो असे वाटले होते. पण इथे तर लाखोंनी पगार घेणारे पत्रकार जुळारी आणि संदेशवाहक निघाले! त्यांचे संदेश आणि कार्य पत्रकारितेला बदनाम करणारे ठरले, याची त्यांना जाणीव तरी आहे का? ‘माध्यम’ म्हणवून घेणाऱ्यांनी असे ‘माध्यम’ म्हणून वागायचे असते का?
उथळपणा,उल्लूगिरी आणि बेफिकिरी यामुळे अनेकांची बोलणी खाणारी प्रसारमाध्यमे सध्या जरा आदराची धनी झाली आहेत. बऱ्याच वर्षांनी एक केंद्रीय मंत्री, एक मुख्यमंत्री आणि एका क्रीडासम्राटाला त्यांनी घरी पाठवले. माध्यमांचा ओसरलेला दरारा पुन्हा निर्माण व्हायला लागला. विरोधी पक्ष, जनांदोलन, संसद आणि सत्ताधाऱ्यांतर्गत गट यापैकी कोणीही जे प्रश्न हाती घ्यायला पुढे येत नव्हते, ते प्रसारमाध्यमांनी उचलले, हाताळले आणि शेवटास नेले. फार दिवसांनी पत्रकारिता अशी वागली. सर्व संपादक सध्या खुशीत आहेत. संपादकीय विभाग पुनरुज्जीवित झाले आहेत. लोकांनाही रोजची दैनिके वाचताना छान, हुरूप आल्यासारखे वाटते आहे. टीव्हीवरच्या बातम्या बघतानाची चिडचिड, पुटपुट अन् हताशा थांबली आहे. काही तरी चांगले घडू शकते, अन्याय- भ्रष्टाचार- लूट यांना लगाम बसू शकतो, अशी आशा फुटू लागली आहे. एक लाख ८० कोटी म्हणजे किती शून्य हो, असा उर्मट प्रश्न मध्यमवर्गीय प्रामाणिक पत्रकारांना करणाऱ्या कॉर्पोरेट जगताला अखेर याच पत्रकारितेने मुंडी खाली घालायला लावली आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे ते सुप्रसिद्ध चार खांब पोकळ शाबीत होता होता राहिले. एकटय़ा एका खांबाने लोकशाही राज्य व्यवस्थेचा महाल सावरून धरला. अशोक चव्हाण, सुरेश कलमाडी अन् ए. राजा यांनी राजीनामे दिले नसते तर स्वत:हून हे चार खांब अन् त्यावरचा इमला उखडून टाकण्याच्या तयारीला लोक लागले असते. पण तसे माध्यमांनी होऊ दिले नाही. एक-दीड वर्षांपूर्वी ‘पेड न्यूज’च्या नशेत वाहवत गेलेली माध्यमे लोकांच्या मनातून पार उतरली होती. त्यामुळे पश्चाताप म्हणा, प्रायश्चित म्हणा, साक्षात्कार म्हणा, माध्यमे एकसाथ काही बडय़ा भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे अशी लागली की भ्रष्टाचारी गावलेच. पळू नाही शकले.
पत्रकारांमुळे राज्यकर्ते घरी जातात, असे गेल्या दोन-तीन दशकांत जगभरच कमी घडले. चार वर्षांपूर्वी इंग्लंडचे काही मंत्री, खासदार खोटी बिले सादर करण्यासारख्या ‘कारकुनी’ गुन्ह्य़ांमुळे पायउतार झाले होते. त्यांनी त्यांच्या बंगल्यावर अन् फ्लॅटवर जो खर्च केलेला नव्हता, तो ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने उघडकीस आणला. काही मंत्री समलिंगी संबंधांमुळे तर काही बाहेरख्यालीपणामुळे मंत्रिपद घालवून बसले होते. जपानमध्येही नुकताच त्यांच्या अर्थमंत्र्याने राजीनामा दिला. त्या देशातही राज्यकर्त्यांची नैतिक पातळी खूप घसरलेली पाहावयास मिळते. पत्रकारितेने तसे राज्यकर्त्यांना नेहमीच नजरेखाली ठेवायचे असते. पण गेल्या २० वर्षांत प्रसारमाध्यमांपुढे कॉर्पोरेट जगताला शरण जाण्याशिवाय काही उरलेच नव्हते. चीनने उच्चारस्वातंत्र्य चिरडून टाकून प्रगती इतकी साधली की तिनेच जगाचे डोळे दीपले. तोंड बंद झाले. ‘भाकरी की स्वातंत्र्य?’ या जुन्या तात्त्विक प्रश्नाचा चीनने आपल्या बाजूने निकाल देऊन टाकला होता. रशियामध्ये पुतीन आलटून-पालटून अध्यक्ष आणि पंतप्रधान असतात. ते विरोधी पक्षांना, नेत्याना, पत्रांना भीकच घालीत नाहीत. अ‍ॅना पोलितोबस्काया ही अत्यंत धाडसी, सत्यदर्शी पत्रकार २००६ साली मारली गेली. ती पुतीन यांचा गैरकारभार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोसळत चाललेले रशियन राज्य चव्हाटय़ावर आणीत होती, एकटय़ानेच. गेल्या महिन्यात तिथे आणखी एका पत्रकाराची हत्या झाली. त्याचा मृत्यूही संशयास्पद. ‘विकी लिक्स’चा पत्रकार ज्युलियन असांजे याने पेन्टॅगॉनची आंतरराष्ट्रीय गुपिते हजारोंनी बाहेर काढली तर त्याच्या मागे लैंगिक छळ, बलात्कार यासारखी झेंगटे लागली. अटक चुकविण्यासाठी त्याला पळ काढावा लागला. नोबेल विजेता लेखक ओरशन पामुक याच्या ‘स्नो’ या कादंबरीचा पत्रकाराच्या भूमिकेतील नायक मारला जातो कारण त्याला इस्लामी बंडखोर आणि लष्करशाही यांच्यातील संघर्षांची बरीच माहिती मिळत जाते. इतकेच काय, ‘पेज थ्री’पासून ‘पिपली लाइव्ह’पर्यंतच्या चित्रपटांत पत्रकारांचे पराभव, भ्रमनिरास, स्वप्नभंग असेच ठळक केले गेले. सबंध देशच जणू भ्रष्ट, दुष्ट, निष्ठुर, स्वार्थी लोकांच्या ताब्यात गेला असून त्याविरुद्ध कोणी ब्रही उच्चारू शकत नाही, असे मळभ सर्वाच्या मनावर दाटून आले होते.
हा काळ तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि जागतिक भांडवलशाहीचा विस्तार यांचा होता. पत्रकारितेत खूप बदल होत होते. २००४ साली ‘दी स्टेट ऑफ दी मीडिया’ असा एक प्रकल्प कोलंबिया विद्यापीठाच्या सहयोगाने पूर्ण झाला. त्यातून घडलेले बदल लक्षात आले ते चकित करणारे होते. एकंदर आठ बदल अमेरिकेतील पत्रकारितेत झाले. ते काही प्रमाणात भारतातही दिसू लागले होते. एक- बव्हंश पत्रे घटत्या वाचकवर्गाचा पाठलाग करीत होती. त्याचा नफ्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे वृत्त विभागावरील खर्चात कपात केली जाऊ लागली. दोन- वृत्तसंकलनावर खर्च वाढविण्याऐवजी वितरणासाठी विभिन्न उपक्रम तयार करण्यावर आणि अन्य वार्ताबाह्य़ उपक्रमांवर खर्च वाढला. तीन- २४ तास वृत्तसेवेमुळे असे एक वातावरण उत्पन्न झाले जे सर्वात आधी वृत्त प्रसारित करण्याच्या नादात कच्ची, संस्कारशून्य बातमी आणि चित्रण दाखवू लागले. त्याचा अर्थातच गुणवत्तेवर परिणाम झाला. चार- अनेक माध्यमांनी असे कार्यक्रम आरंभिले, ज्यांनी पत्रकारितेतील सत्यता, अचूकता हे निकष लावणेच सोडून दिले. वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी आणि वाचकांसाठी वेगवेगळ्या निकषांनी बातम्या सादर केल्या जाऊ लागल्या. पाच- कमाई घसरल्यामुळे ग्राहक टिकविण्यासाठी निम्न श्रेणीचे कार्यक्रम वाढले. त्यामुळे चोखंदळ वाचक, प्रेक्षक आणखीनच वैतागले. सहा- इंटरनेट, मोबाईल, रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र अशी एका माध्यमाची बहुविध आवृत्ती पर्याय म्हणून उभी राहताच, ग्राहकांना जरा समाधानकारक आशय मिळू लागला. विशेषत: नव्या पिढीसाठी हे आवश्यक होते. सात- नफ्यासाठी इंटरनेट हे माध्यम वृत्तमाध्यम म्हणून कितपत योग्य आहे याचा पडताळा येईनासा झाला आहे. आठ- ज्यांच्यामुळे बातमी विकली जाईल (खपेल) अशा ‘हाय प्रोफाईल’ म्हणजे उच्चस्तरीय स्रोतांची मागणी वाढल्यामुळे ‘चेकबुक जर्नलिझम्’चा प्रकार फळफळला. सेलिब्रिटी अथवा व्यक्तिकेंद्रीय बातम्यांसाठी स्पर्धा हे त्यामागील कारण.
या व्यक्तिनिष्ठ पाश्र्वभूमीवर भारतीय पत्रकारितेतही तारे चमचमू लागले. समस्याकेंद्री, लोककेंद्री पत्रकारितेपेक्षा व्यक्तिकेंद्री, सनसनाटी आणि खमंग विषयकेंद्री पत्रकारिता सुरू झाली. अभ्यास, विश्लेषण, विचार मागे जाऊन लोकप्रियता, वाक्पटुता, चातुर्य, खळबळजनकता हे निकष पत्रकाराला आवश्यक केले जाऊ लागले. हळूहळू एकेक माध्यम म्हणजे एकेक व्यक्ती असे समीकरण पैदा होऊन सुभेदाऱ्या मिरविल्या जाऊ लागल्या. अशाच व्यक्तींमुळे ए. राजा यांच्या प्रकरणात पत्रकारांची नावे उघडकीस आली. ‘एनडीटीव्ही’च्या बरखा दत्त आणि ‘हिंदुस्तान टाइम्स’चे वीर संघवी यांनी गेल्या वर्षी राजा यांनाच दळणवळण खाते मिळावे यासाठी भरपूर संपर्कसत्रे केली, असे सांगणाऱ्या ध्वनिफिती आयकर खात्याने जारी केल्या आहेत. या खात्याची नजर नीरा राडिया या एका मध्यस्थ, जनसंपर्कसदृश काम करणाऱ्या महिलेवर होती. तिच्यावर राजा यांची बाजू लावून धरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. टाटा, रिलायन्स आदी कंपन्यांची ती मध्यस्थ आहे. राडिया हिने बरखा आणि संघवी यांना अनेक फोन करून काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या संपर्कात राहून राजा यांच्यासाठी आग्रह धरण्यास बजाविले होते. या दोन्ही पत्रकारांनी आपापले खुलासे केले. पत्रकारितेत अनेकांशी बोलावे लागते, (आर. आर. पाटील त्यांच्याजवळ गुन्हेगार येऊन छायाचित्रे काढून घेऊ लागल्यावर, व्यासपीठावर शेजारी बसू लागल्यावर असेच म्हणाले होते) संपर्कात राहावे लागते, याचा अर्थ ‘लॉबिंग’ केले असा होत नाही असे त्यांचे म्हणणे!
पत्रकारितेतून मिळणारी प्रसिद्धी आणि माहिती कशी जनहितासाठी वापरली जात नाही, याची चुणूक या राडिया-बरखा-संघवी प्रकरणाने दाखविली आहे. वाटले होते, आमचा तालुका पातळीवरील पत्रकार पोटासाठी अशी ‘जोडकामे’ आणि ‘संदेशवहना’चे काम करतो. निवडणुका आल्या की त्याचा भाव वधारतो. पण इथे तर लाखोंनी पगार घेणारे पत्रकार जुळारी आणि संदेशवाहक म्हणून कार्यरत! त्यांचे संदेश आणि कार्य देशाला किती बुडवून टाकणारे निघाले, याची त्यांना काही जाणीव असेल का? ‘माध्यम’ म्हणवून घेणाऱ्यांनी खरोखर माध्यम म्हणून असे वागायचे असते का? जनता आणि सरकार किंवा ज्ञान आणि अज्ञान, फार तर असत्य आणि सत्य यामधील जागा प्रसारमाध्यमांनी हाताळायच्या असतात. दलाली हा काही पत्रकारांचा व्यवसाय नसतो; परंतु दोहोतील सीमारेषा पुसल्या गेल्या. पत्रकारितेत माहिती आणि ज्ञान यापेक्षा मनोरंजन आणि उत्तेजन यांचीच गजबज वाढली. राज्यकर्त्यांच्या नीतिमत्तेची उठाठेव करणाऱ्यांना पत्रकारांच्या नीतिमत्तेची काही चाड नसते की काय? पत्रकारांना तरी बोल का लावावा? बव्हंश वृत्तपत्रे थेट राजकीय नेत्यांच्या मालकीची झाली. मग त्यांच्यात राजकीय छक्केपंजे आले तर काय चुकले त्यांचे? इतके दिवस आपण लोकशाहीचे एक खांब नसून राज्यसत्तेचे एक स्तंभ आहोत, असा त्यांचा समज झाला होता तो त्यामुळेच. तरीही ही प्रकरणे कशी काय निघाली बुवा? आपल्यातीलच दुबळ्या दुव्यांना भ्रष्ट राज्यकर्त्यांनी माध्यमांच्या तोंडी दिले असावे काय? राजकीय मालक आणि पत्रकार यांची फारच बदनामी होऊ लागल्याने त्यांनी लोकांना चघळायला असा एक विषय देऊ केला आहे की काय?पत्रकारितेचा एक जागतिक सिद्धान्त आहे- ‘कम्फर्ट दी अ‍ॅफ्लिक्टेड अ‍ॅण्ड अ‍ॅफ्लिक्ट दी कम्फर्टेड’. म्हणजे त्रासलेल्यांना दिलासा द्या अन् सुखासीनांना अस्वस्थ करा! याचा अर्थ बातमी आणा, वस्तुस्थिती जाणा आणि ती जगाला पोहोचवा एवढी मर्यादित पत्रकारिता नाही. पत्रकाराची नैतिकता दुर्बलांचे दैन्य हटविण्याच्या, आवाज न उठवू शकणाऱ्यांना आवाज देण्याच्या आणि अत्याचारितांना न्याय मिळवून देण्याच्या बाजूची असावी लागते. अन्याय वेशीवर टांगण्यासाठीच फक्त नसतो. त्याची तड लागण्याची वाट तो पाहत असतो. बहुधा अशीच जाणीव माध्यमांच्या कारभाऱ्यांना झाली अन् त्यांनी एकापाठोपाठ एक गडी बाद केले. हे इतक्या झटपट झाले की कोणालाच त्या आड येता आले नाही. माणसाला बऱ्याचदा स्वत:चीच चीड येते, कीव येते. प्रसारमाध्यमे अशी स्वत:ला अकारण हतबल आणि हितसंबंधी मानीत राहिली. थोडीशी इच्छाशक्ती, बरेचसे आत्मबल आणि प्रचंड उद्वेग काय करून गेला बघा! एडिटरला ऑडिटराने प्रेरणा दिली. दोघांनी मिळून जो काय लेखाजोखा घेतला त्याला तोड नाही. लोकमान्य म्हणायचेच ना, वृत्तपत्रेकर्ते जनतेचे कोतवाल आणि वकील होत..!

जयदेव डोळे,
रविवार, २८ नोव्हेंबर २०१०

Media’s the message

Do we have a crisis in Indian journalism? Or is it just the way some journalists are perceived? Or is this a distinction without a difference? The unfortunate truth is if — because of a few — you can’t trust what you read or see, then you’re perilously close to dismissing journalism
itself.
So let me share with you how I view the conversations revealed by Outlook and Open magazine. That might help you assess the transcripts and interpret what they suggest. For this purpose I shall assume they’re accurate.

It seems some (but not all) of the journalists on the Niira Radia transcripts willingly agreed to carry messages or speak on her behalf (or that of her clients) to the Congress party. It’s also clear this was about the inclusion or exclusion of specific DMK MPs in the Cabinet, the level of ministership they would get and the portfolio to go with it.

The first issue is what does this amount to? At the least it is carrying of messages. The journalists agreed to be ‘couriers’ or ‘go-betweens’. But is that lobbying? It sounds and feels like it. But this could be debatable. However, if in addition to conveying messages, they sought to persuade that might clinch the issue.

The second issue flows from the first: is this suitable behaviour for a journalist? It all depends on the message. There can’t be a principle against delivering messages. But if the content is to make A a minister or keep B out of the Cabinet or plead for a special portfolio for C, it would seem inappropriate.

The reason is simple. Trying to find out who will be a minister and what portfolio he or she will get — which is a legitimate function of journalism — is markedly different to playing a role in ensuring a ministership or a special portfolio for a particular individual. One is an inquiry. The other is taking sides.

The third issue is more complicated but also more critical to whatever conclusion you come to. Can we accept at face value what the tapes suggest was happening? In other words, did the journalists really agree to be messengers/lobbyists or were they pretending? After all, it’s not unheard of for people to ‘agree’ to do something as a way of advancing a conversation or obtaining information but not intending to deliver.

I don’t know the answer and nor can you. Each of us will have our suspicions and hunches. In part it depends on how much we want to keep faith with the journalists involved. So let’s leave it at that.

But if you believe they did deliver then two further issues arise. Did they do so simply as a favour to Radia and her clients? Or did they benefit from doing so?

Again, we don’t know and all we can do is suspect or guess. But I’d add that if you’ve come this far you are, sadly, close to questioning their integrity.

There is, however, another point to be made. Whether they did it as a favour or for payment they were, in either case, using the access and influence of their profession and/or their employers for purposes above and beyond what it is intended for. Is this misuse? Frankly, it’s hard to say no.

Finally, how damaged is the image of the Indian media? That is, of course, a far bigger concern. It all depends on the response of the newspapers and television channels involved.

*The views expressed by the author are personal

Karan Thapar,
27 Nov 2010.

Saturday, July 26, 2008

19 HORSES (Trick)

One rich man owned 19 horses when he died. In his last will and teastament he had written that upon his death, half the horses he owned should go to his only son; one fourth to the village temple and one fifth to the faithful servant. The village elders could not stop scratching their heads. How can they give half of the 19 horses to the son? You cannot cut up a horse. They puzzled over this dilemma for more than two weeks and then decided to send for a wise man who was living in a neighbouring village. The wise man came riding on his horse and asked the villagers if he can be of any help to them. The village elders told him about the rich man's last will and testament which stated that half of the (19) horses must be given to his only son, one fourth must go to the temple and one fifth to the faithful servant. The wise man said he will immediately solve their problem without any delay whatsoever. He had the 19 horses placed in a row standing next to one another. Then he added his own horse as the 20 th horse. Now he went about giving half of the 20 horses – that is ten horses to the son. One fourth of 20- that is 5 horses were given to the temple committee. One fifth of twenty- that is 4 horses were given to the faithful servant. Ten plus five plus four made 19 horses. The remaining 20 th horse was his own which he promptly mounted, spoke a few inspiring words, and rode back home. The villagers were simply dumfounded, full of disbelief and filled with admiration. And the parting words of the wise man were inscribed in their hearts and minds which they greatly cherished and passed on to their succeeding generations till today. The wise man said: In our daily lives, in our daily affairs, simply add God's name and then go about facing the day's happenings. Ever come across problems in life that are seemingly insurmountable? (Like the villagers, do we feel that such problems cannot be solved?). The wise man continued: Add the God Principle in our daily lives and the problems will become lighter and eventually will disappear. In the manner of the ice which, with the addition of the heat principle will turn into water, and that will eventually evaporate as steam and disappear. And how do we add God's name in our daily lives? Through prayers, filled with true love and devotion with sincerity of purpose and dedication that only total faith can bring about. Meditation is a powerful means of directing the mind Godward. But without true love and devotion entering into it, it remains like a boat without water. It is not difficult to push a boat that is floating in water, but extremely hard to drag the same boat on dry land.